नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ : अनेक गावांचा वीजपुरवठा गायब : बंधाऱयात लाकडे अडकून पाणी थेट शेतशिवारात
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात सतत दुसऱया दिवशीही धुवाधार पाऊस बरसला. मृग नक्षत्रात बऱयाच वर्षांनंतर मोठा पाऊस झाल्याची चर्चा आहे. या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ होत असून शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. असोगा बंधाऱयात लाकडाचे आंsडके व कचरा अडकल्याने नदीचे पाणी शेतवडीत घुसून नुकसान झाले आहे.
तालुक्यात यावर्षी पहिल्याच नक्षत्रात मोठा पाऊस झाल्याने यावर्षीही महापूर येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात मलप्रभा नदी कोरडी पडते. गेल्या जानेवारीपासून प्रत्येक महिन्याला थोडाफार पाऊस झाल्याने ऐन उन्हाळय़ातही मलप्रभा नदीला पाणी होते. परिणामी बऱयाच वर्षांनंतर मलप्रभा नदीत बाराही महिने पाणी होते. गेल्या दोन दिवसात पडलेल्या मोठय़ा पावसाने नदी-नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. असाच पाऊस आणखी दोन दिवस झाल्यास तालुक्यातील नदी-नाल्यांवर असलेल्या काही पुलांवर पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन झाले तरी पावसाच्या सरी बरसत राहिल्या.
कुप्पटगिरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील जुन्या पुलावर पाणी आल्याने कुप्पटगिरीचा जुना रस्ता बंद झाला आहे. हब्बनहट्टीजवळील स्वयंभू मारुती मंदिराच्या स्लॅबपर्यंत पाणी आल्याने देवळाचा बराच भाग पाण्याखाली गेला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतवडीत पाणीच पाणी झाल्याने अनेक शेतकऱयांनी पेरलेले भात कुजण्याची शक्यता आहे. ज्यांचे भात उगवण्यास प्रारंभ झाला होता, ते भात शेतीवाडीतील खेकडे खाऊन टाकतात. यापुढे दुबार पेरणी करता येणे कठीण असल्याने त्या शेतकऱयांना भाताची रोपे लावण्यावाचून दुसरा पर्याय नाही. मात्र काही शेतकऱयांनी एप्रिल-मे महिन्यात पडलेल्या पावसाचा लाभ उठवत भात पेरणी लवकर केल्याने त्यांचे भात उगवले आहे. त्या भातामध्ये एकदा कोळपणी केल्याने पावसाचा त्या शेतकऱयांना लाभ होणार आहे. त्यातच पावसाबरोबर वाऱयाचाही जोर आहे. यामुळे काही ऊस उत्पादक शेतकऱयांचा चांगला वाढलेला ऊस आडवा झाल्याने त्याचा संबंधित शेतकऱयांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
असोगा बंधाऱयाचे पाणी शेतवडीत
तालुक्यात मलप्रभा नदीवर पूर्वी कणकुंबीपासून तालुक्याच्या हद्दीपर्यंत मलप्रभा नदीवर केवळ कुसमळी, शंकरपेठ, असोगा, खानापूर या ठिकाणी नदीवर पूल होते. यामुळे पावसाळय़ात त्या पुलांमध्ये लाकडे व कचरा अडकण्याचे प्रकार घडत होते. पुलांची संख्याच कमी असल्याने त्यावेळी याचा एवढा परिणाम होत नव्हता. पण आता मलप्रभा नदीवर जागोजागी पूलवजा बंधारे आहेत. त्यामध्ये कणकुंबीपासून खानापूरपर्यंत असलेल्या पूलवजा बंधाऱयांवर लाकडे, झाडेझुडपे तसेच कचरा मोठय़ा प्रमाणात अडकतो. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पुलांवर पाणी येते. परिणामी रस्ते बंद होतात. काही ठिकाणी बंधाऱयांचे पाणी पुढे जाण्यास वाव नसल्याने ते शेतवडीत घुसून शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान होते.
दरवर्षी मलप्रभा नदीला आलेल्या पहिल्या पुरात असोगा येथील ब्रिजकम बंधारा ब्लॉक होतो. आजुबाजूच्या शेतकऱयांची शेती पाण्याखाली जाऊन भात, ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान होते. मागील वर्षी या बंधाऱयाचा भोसगाळी गावच्या बाजूचा भराव पाण्यात वाहून गेला होता. परंतु लघुपाटबंधारे विभागाने भराव परत बांधला नाही. त्यामुळे असोगा व भोसगाळी येथील शेतकरीवर्गाला तसेच पर्यटकांना पलीकडे जाण्याचा रस्ताच बंद झाला. भराव वाहून गेल्याने बंधाऱयाच्या पलीकडे असलेल्या मारुतीच्या देवळाकडे भाविक जाऊ शकले नाहीत. त्यातच आता गेल्या दोन-तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे बंधाऱयाचे पाणी यावर्षीदेखील दोन्ही बाजूच्या शेतवडीत घुसल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. वास्तविक दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी सदर पूलवजा बंधाऱयाची जबाबदारी असलेल्या मायनर इरिगेशन खात्याने या संदर्भात कायमचा तोडगा काढून दरवर्षी होणारे शेतकऱयांचे नुकसान टाळावे, अशी मागणी केली जात आहे.
अनेक गावांची वीज गायब
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस त्यातच सोसाटय़ाचे वारे यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा बुधवारपासून बंद पडला आहे. त्यापैकी काही गावांचा वीजपुरवठा गुरुवारी दुपारनंतर पुन्हा सुरू झाला असला तरी तालुक्याच्या पश्चिम भागातील कालमणी, हब्बनहट्टी, गोल्याळी, चिखले, पारवाड, कणकुंबी तसेच त्या परिसरातील काही गावे अंधारात आहेत. हीच परिस्थिती पश्चिम भागातील इतरही गावात निर्माण झाली आहे. या भागातील वीजवाहिन्या जंगल भागातून गेल्याने नेमका वीजपुरवठा कुठून खंडित झाला आहे, हे शोधण्यासाठी हेस्कॉम कर्मचाऱयांना बरीच कसरत करावी लागते. त्यातच पश्चिम भागातीलच निलावडे, नेरसा, शिरोली ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील बऱयाच गावांतील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित आहे.