प्रतिनिधी / खानापूर
लॉकडाऊन काळात बंद झालेली खानापूर-पारवाड वस्तीची बस त्वरित सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन ऍन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया खानापूर शाखेच्यावतीने आगार प्रमुख शिरगुप्पी यांना गुरुवारी सादर करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात तालुक्यातील संपूर्ण बससेवा बंद झाल्या होत्या. आता लॉकडाऊन उठल्यानंतर तालुक्यातील अनेक मार्गावरच्या बससेवा सुरू झाल्या पण खानापूर-पारवाड मार्गावरील वस्ती बससेवा मात्र अद्याप सुरू करण्यात आली नाही. ही बस खानापूरहून सायंकाळी जांबोटीमार्गे पारवाडला वस्तीसाठी जात होती व सकाळी 7 वाजता पारवाडहून सुटून खानापूरला येत होती. या बससेवेत पारवाड ते जांबोटी मार्गावरील गावकऱयांना खानापूरला येण्या-जाण्याची चांगलीच सोय झाली होती. या शिवाय जांबोटी किंवा खानापूरला शाळा-कॉलेजसाठी येणाऱया विद्यार्थ्यांनादेखील ही बस सोयीची असल्याने ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आगार प्रमुख शिरगुप्पी यांनी निवेदनाचा स्वीकार करुन येत्या दोन दिवसात पारवाड वस्तीची बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील काही मार्गाचा अपवाद वगळता जवळपास सर्वच मार्गावर आता बससेवा सुरू झाल्या आहेत. पण अद्याप प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा ग्रामीण भागातील प्रवाशांनीही बससेवेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. सदर निवेदन देताना ऍन्टीकरप्शन फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष रविचंद्र पाटील, विजय गावडे, मुरलीधर पाटील, मारुती बुवाजी, राजू सिद्धाणी, नारायण पाटील, भरमाणी पाटील, सदानंद तोरगल, पुंडलिक मुतगेकर यासह इतर उपस्थित होते.