प्रतिनिधी / कोल्हापूर
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा भारत सरकारने आता पद्मभूषण नव्हे पद्मविभुषण पुरस्काराने गौरव करावा, ही मागणी घेऊन खाशाबा यांचे चिरंजीव रणजित आणि सहकाऱयांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शनिवारी भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती यांच्याकडे पुरस्कारासाठी खाशाबांच्या नावाची शिफारस करावी, अशी विनंती रणजित यांनी कोश्यारी यांच्याकडे केली. त्यांनीही लवकरच पुरस्कारांसाठी शिफारस केली जाईल, अशी ग्वाही रणजित यांना दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत रणजित यांनी कोश्यारी यांना खाशाबा जाधव यांच्या कामगिरीची माहिती सांगितली. ते म्हणाले, हेलीसिंकी (फिनलॅण्ड) येथे झालेल्या ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत कराड येथील (कै.) खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. असे असूनही केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱया प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून वंचित आहेत. 1996 सालानंतर झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 15 खेळाडूंनी भारताला पदके जिंकून दिली. त्या सर्वाचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव झाला आहे. मात्र 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खाशाबा जाधव यांचा पुरस्काराने गौरव झालेला नाही. त्यांचा पद्मभुषण पुरस्काराने गौरव करण्याची मागणी होत असली तरीही आता त्यांचा पद्मविभुषण पुरस्काराने गौरव करणे योग्य होईल, असे रणजित यांनी राज्यपाल कोश्यारी यांना सांगितले.
यानंतर राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे (पुणे) प्रवक्ते संग्राम कांबळे यांनी सांगितले की घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत खाशाबा यांनी मल्लविद्येचे धडे घेतले होते. तसेच हेलीसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देत महाराष्ट्रासह भारताचे नाव जगाच्या पटलावर आणले होते. कोश्यारी यांनीही खाशाबा यांच्या कुस्तीतील अलौकिक कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्यांचा पद्मविभुषण पुरस्कारानेच गौरव केला जावा, अशी शिफारस राष्ट्रपतींकडे केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी खाशाबा यांचे पुतणे शामराव जाधव, मल्ल वैभव मोरे उपस्थित होते.