निपाणीसह ग्रामीण भागातील चित्र : शिक्षण खात्याचे कारवाईकडे दुर्लक्ष
वार्ताहर/ निपाणी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गात दक्षता घेताना शासनाने आजतागायत शाळा सुरू केलेल्या नाहीत. येत्या काळात शाळा कधी सुरू करायच्या हा निर्णय घेण्याचे धाडसही केलेले नाही. यामुळे प्रत्येकाचे लक्ष कोरोनाचा प्रतिबंध होतो कधी आणि शाळा सुरू होणार कधी, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दहावीच्या परीक्षा घेण्याची तारीख निश्चित झाली असली तरी कोरोनाच्या धास्तीने अनेक पालक पाल्याचे वर्षाचे नुकसान झाले तरी चालेल पण परीक्षेला पाठवणार नाही, अशा पवित्र्यात आहेत. असे असताना निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात खासगी शिकवण्या, संगणक वर्ग बेधडक सुरू आहेत.
संपूर्ण देशभरात कोरोना संसर्ग वाढताना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येने देशाचे नाव कोरोनो बाधितांच्या संख्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. यामुळे प्रशासनाच्या हृदयाचे ठोके वाढले असून संसर्ग कमी करण्यासाठी कराव्या लागणाऱया उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठीचा उपाय म्हणून देश पुन्हा लॉकडाऊन करण्याची चर्चा पुढे येऊ लागली आहे.
या सर्व प्रकारातून कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येकजण खबरदारी घेत असला तरी अनेकांना याचे गांभीर्यच नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोना संसर्गापुढे काहीच नाही हे माहिती असतानाही पैशांचा हव्यास मात्र सुटलेला दिसत नाही. याचीच प्रचिती सध्या निपाणी शहर व ग्रामीण भागात बेधडक भरविण्यात येत असलेल्या खासगी शिकवण्या व संगणक वर्गातून येत आहे.
कोरोना संसर्गावर वैद्यकीय शास्त्रात अजून कोणतेही औषध अथवा प्रतिबंधक लस निर्माण झालेली नाही. यामुळे यावर रामबाण उपाय म्हणून खबरदारीच स्वीकारली पाहिजे. सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर व नियमित स्वच्छता हे खबरदारीचे माध्यम मानले जातात. म्हणून शिक्षण खात्याने हे सर्व नियम पाळले जाणे अशक्य वाटत असल्यानेच शाळा सुरू करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत धन्यता मानली आहे.
शिक्षण खात्याच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करत खासगी शिकवण्या व संगणक वर्ग चालकांनी दुर्लक्ष करत ज्ञानसेवा ही पैसे मिळविण्याचे साधन म्हणून वर्ग भरविण्यास सुरुवात केली आहे. शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या या प्रकारातून ज्ञानार्जनासाठी पैसे मोजून विद्यार्थी एकत्र येत आहेत. अशाठिकाणी मास्कचा वापर केला जात असला तरी सामाजिक अंतर राखण्याचा नियम पायदळी तुडवला जात आहे. विविध ठिकाणावरून विद्यार्थी एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. असे असताना या वर्ग भरविण्याच्या धाडसाकडे दुर्लक्ष करत शिक्षण खाते अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहे. वर्ग भरविण्याचा धोका लक्षात घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
कठोर कारवाई करणार
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तोच नियम खासगी शिकवण्या व संगणक वर्गासाठी लागू होतो. असे असतानाही जर खासगी शिकवण्या, संगणक वर्ग सुरू करणे योग्य नाही. तरीही जर आयुक्त किंवा तहसीलदार यांची परवानगी घेऊन जर वर्ग सुरू केले असतील तर चौकशी करणार आहे. जर कोणत्याही परवानगीविना वर्ग सुरू केले असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार आहे, असे गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी सांगितले.