डाक बंगला परिसरासह पाच गावांतील 5935 जणांची तपासणी
प्रतिनिधी/ खेड
अलसुरे येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने तातडीने आयसोलेट पाच गावांसह शहरातील डाकबंगला परिसरात डोअर टू डोअर सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी 21 पथके कार्यरत असून तिसऱया दिवशी 1524 घरांचे आरोग्य पथकाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणादरम्यान 5935 जणांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, तिसऱया दिवशीही अत्यावश्यक सेवांची दुकाने बंदच होती.
अलसुरे येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने झालेल्या मृत्यूनंतर शहरातील डाकबंगल्यासह 5 गावांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर केला असून सर्वच मार्ग सील करण्यात आले आहेत. व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोधमोहीम सुरूच आहे. आतापर्यंत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 36 जणांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील 28 जणांना कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित 8 जणांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य विभागाने अलसुरे, भोस्ते, कोंडीवली, मोरवंडे, निळीक या पाच गावांमध्ये सर्व्हेक्षणाची मोहीम अधिक तीव्र केली आहे. तिसऱया दिवशी पाच गावांतील 987 घरांचे सर्व्हेक्षण करून 4451 जणांची तपासणी करण्यात आली. या पाच गावांतील सर्व्हेक्षणासाठी 14 आरोग्य पथके तैनात आहेत. शहरातील डाकबंगला परिसरातील सर्व्हेक्षणासाठी 7 स्वतंत्र आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाने दिवसभरात 537 घरांचे सर्व्हेक्षण करत 1484 जणांची तपासणी केली.
या सर्व्हेक्षणापाठोपाठ मुंबई, पुणेसारख्या ठिकाणांहून येणाऱया नागरिकांवरही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येत आणखी चौघांची भर पडली असून होम क्वारंटाईनचा आकडा 306 वर जाऊन पोहोचला आहे. क्वारंटाईन करण्यात येणाऱया नागरिकांसाठी भडगाव-खोंडे येथील आय.सी.एस. महाविद्यालयात संस्थात्मक विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी दोघे निगराणीखाली आहेत.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये असलेल्या 28 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना तेथेच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यातील काहीजणांना रविवारी आय.सीएस. महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात हलवण्याच्या हालचाली सुरू होत्या. तिसऱया दिवशीही जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची दुकाने बंदच होती. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत सन्नाटा पसरून रस्तेही ओस पडले होते.