पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, दक्षतेचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा संसर्ग खेडय़ांमध्ये वाढत असून खेडय़ांना वाचविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात लस पोहचविण्यासाठी केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असून लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ग्रामीण भारता संसर्ग रोखण्यासाठी विशेष उपाय करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱयांना केली.
प्रत्येक खेडय़ात निर्बंधित क्षेत्र तयार करून तेथे त्या गावातील कोरोना रुग्णांची सोय केली जावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांनी गावागावांमध्ये विशेष मानवबळ उपलब्ध करून द्यावा. विशेष अधिकाऱयांची नियुक्ती करावी. चाचण्यांच्या प्रमाणात वाढ करून बाधित लोकांना वेळीच इतरांपासून विलग करावे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय ग्रामीण भागांमध्ये लस पुरवठा करण्याच्या योजनेवर कार्य करीत आहे. प्रत्येक जिल्हय़ात सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती केंद्र स्थापन करण्याच्या कामाला वेग आला आहे, इत्यादी सूचनाही त्यांनी केला.
राज्यांसाठी विशेष योजना
राज्यांना पंधरा दिवसांचा लसीकरण कार्यक्रम आणि लस पुरवठा आधीच दिला जावा, असा केंद्राचा प्रयत्न आहे. राज्यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली असली तरी आपल्याला अधिक दक्षता बाळगावीच लागणार आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
खेडय़ांचे सामर्थ्य वेगळेच
गेल्या उदेकाच्या वेळी खेडय़ांमध्ये, विशेषतः कृषी क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात आला नव्हता. तरीही ग्रामस्थांनी सामाजिक अंतरासारख्या नियमांचे पालन केले. त्यामुळे तेथे कोरोनाचा प्रसार फारसा झाला नाही. ग्रामीण भागांमधील लोकांना सरकारने केलेले नियम माहीत असतात. ते त्यांच्या सोयीनुसार आणि आवश्यकतेनुसार या नियमांमध्ये परिवर्तन करून त्यांची स्वतःची व्यवस्था निर्माण करतात व स्वतःचे संरक्षण करतात. खेडय़ांचे हे सामर्थ्य कौतुकास्पद आहे. सर्वांनी या यापासून धडा घेतल्यास योग्य होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.