वार्ताहर / खोची
सोमवारपासून पाणलोट क्षेत्रात व वारणा नदी परिसरात सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खोची ता. हातकणंगले परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी सकाळी प्रचंड प्रमाणात वाढ झाली. या पाण्यामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या खोची-दुधगाव दरम्यानच्या बंधाऱ्यावर पाणी येऊन हा बंधारा वाहतुकीसाठी बंद झाला. दुपारी तीन वाजता बंधाऱ्यावर पाच फूट पाणी आले होते.
पावसाचा जोर कायम असल्याने आणखीन मोठ्या प्रमाणात पाणी वाढण्याची शक्यता आहे. अचानक पाण्यात वाढ झाल्यामुळे नदीकाठचे विद्युत पंप पाण्यात बुडाले. तर जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे ऊस पिके मोठ्या प्रमाणात जमिनदोस्त झाली आहेत. एका दिवसात वारणा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने गतवर्षीच्या महाप्रलयंकारी महापुराच्या आठवणीने नदीकाठचे शेतकरी आपली जनावरे व साहित्य गावाकडे हलविताना दिसत आहेत. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वारणा नदी परिसरातील नागरिक सतर्क झाले आहेत. वारणा नदीच्या होत असलेल्या पाणीपातळी वाढीवर महसूल विभाग, पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहे.