गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत आरोप : आमदार विजय सरदेसाईंच्या विरोधात अपप्रचार
प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक हे आमदार विजय सरदेसाई यांनी विकासकामे केली नसल्याचे सांगून तसेच त्यांच्या विरोधात खोटे मुद्दे मांडून फातोर्डावासियांची दिशाभूल करू पाहत असले, तरी फातोर्डावासीय सुज्ञ असून येत्या निवडणुकीत नाईक यांना त्यांची जागा ते दाखवून देतील, असा दावा गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
पावसाळय़ात जशी बेडके आवाज करतात तसे काही पडेल आमदार निवडणुका नजीक आल्यावर आवाज करताना आढळतात. परंतु दिशाभूल केली म्हणून लोक मते देत नसतात. विकास पाहूनच लोक मते देतात. म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत फातोर्डात आमचे आठ, तर भाजपाचे तीनच उमेदवार जिंकून आले हे नाईक यांनी लक्षात ठेवावे, असे गोवा फॉरवर्डचे फातोर्डा गटाध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री असताना लाल बत्तीची गाडी घेऊन फिरण्यापलीकडे काही केले नसल्याचे म्हटल्याने नगरसेवक रवींद्र नाईक यांनी नाईक यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्र्यांच्या गाडय़ांना लाल बत्ती लावणे हे कधीच बंद केले गेले आहे याची जाण नाईक यांना नसून उगाच बडबड करण्याच्या पलीकडे या पडेल आमदाराला काम नसल्याचे ते म्हणाले. सरदेसाई मंत्री असताना सरकारी नव्हे, तर स्वतःची गाडी घेऊन फिरत होते. मात्र सध्या नाईक रवींद्र भवनच्या गाडीचा पुरेपूर वापर करून घेत असल्याची टीका त्यांनी केली.
शेतकऱयांना सरदेसाईंकडून पूर्वीपासून मदत
सरकार खत, बियाणावर 50 टक्के सवलत देते हे खरे आहे. मात्र अन्य 50 टक्के आपल्या खिशातून घालून सरदेसाई शेतकऱयांना जेव्हा आमदार नव्हते तेव्हापासून म्हणजे मागील दीड दशकापूर्वीपासून मदत करत आले आहेत. याची शेतकऱयांना जाण आहे. मात्र नाईक हे फक्त दिशाभूल करत असल्याचे निमिशा फालेरो यांनी नजरेस आणून दिले.
साकवाला पूल म्हणणाऱयांनी विकासावर बोलू नये
आमच्या आमदाराने भरघोस विकास केला म्हणूनच आधीचा प्रभाग 9 सोडून प्रभाग 4 मधून विक्रमी मताधिक्मयाने आपण निवडून आले. नाईक यांना विकास म्हणजे काय ते कळणार नाही. कारण त्यांना पूल व साकव यातील फरक कळत नाही. साकव हा पूल असल्याचे सांगणाऱयांनी विकासकामांबाबत बोलू नये, असा सल्ला माजी नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी यावेळी नाईक यांना दिला. ट्रक टर्मिनलसाठी तसेच अन्य विकासकामे राबविण्यासाठी जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या तेव्हा दामू नाईक हे आमदार होते, असा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे त्यांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे, असे यावेळी सांगण्यात आले.
‘सोनसडय़ाच्या बाबतीत दामू नाईककडून फक्त राजकारण’
सोनसडाप्रकरणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी दामू नाईक यांनी कधीच प्रयत्न केले नाहीत. वरून या प्रश्नी राजकारण केले, अशी टीका नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी यावेळी बोलताना केली. नुकतेच लेगसी कचऱयाचे रेमिडिएशन केल्यानंतर राहिलेला इनर्ट कदंबच्या जागेत टाकण्यासाठी गोवा घनकचरा महामंडळ जात असता नाईक यांनी लोकांची दिशाभूल करून त्यांना हा प्रकार बंद करण्यास पाठविले. कदंब व घनकचरा महामंडळ हे सरकारी विभाग आहेत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आम्ही आवश्यक परवाने मिळविले होते. त्यामुळे नंतर इनर्ट तेथे टाकण्यात आले. पालिका व स्थानिक आमदार सोनसडा समस्या सोडविण्यासाठी सध्या पुढाकार घेत आहेत, तर या समस्येचे राजकारण करण्यासाठी दामू नाईक या कामांत खो घालण्यापलीकडे काही करत नसल्याची टीका नगराध्यक्षांनी केली.