वसिम शेख/ कुडाळ
केंजळ खाणीतून अनधिकृतरित्या गौणखनिज तालुक्याच्या बाहेर पुणे येथे घेऊन जाणाऱया गडोखच्या गाडय़ा जात असताना मेढा घाटामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह स्थानिक नागरिक व महिलांनी रोडवेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डंपर अडवली व त्यानंतर महसूल विभागाच्या ताब्यात दिली. दरम्यान, महसूल विभागाने दोन्हीही डंपर जप्त करत आत्तापर्यंत जावळी तालुका जेवढा गौण खनिज उत्खनन घेऊन गेले आहेत त्यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत ‘तरुण भारत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करुन पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले आहे.
यापूर्वीही काही दिवसांपूर्वी तहसीलदार शरद पाटील यांनी जावळी तालुक्याच्या बाहेर परजिह्यात अशाच पद्धतीने गौण खनिजाची अनधिकृत वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती व सदर वाहने तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही राजरोसपणे कोणालाही न जुमानता अशा प्रकारच्या अनधिकृत वाहतूक सुरू असल्याने बुधवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी व स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत घाटामध्ये वाहने अडवली. मानकुमरे यांनी घटनास्थळावर यापूर्वीही महसूल विभाग आणि बांधकाम विभागाच्या निदर्शनास सदर अनाधिकृत गौण खनिजाची वाहतूक ठेकेदार यांच्या माध्यमातून होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मानकुमरे यांनी केला.
दिलेल्या माहितीनुसार केवळ केंजळ खाणीतून महाबळेश्वर विटा सुरु असणाऱया रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी या खाणीतून खडी व दगड वापरण्याची परवानगी संबंधित कंपनीला होती. मात्र या सर्व नियमांना फाटा देत केंजळ खाणीतून थेट पुणे येथे मालाची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना व महिलांना मिळाल्यानंतर मेढा घाटामध्ये बुधवारी जावळी तालुक्यातील पुणे येथे निघालेले डंपर अडवले. रोडवेज इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, रोडवेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे सुरू असणाऱया रस्त्याच्या कामासाठी जावळी तालुक्यातील खडी, ग्रीट, डबर वापरण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती संबंधित डंपर चालकांनी आंदोलनाच्या प्रसंगीच स्थानिक नागरिकांना बोलून दाखवली. गडोख हा ठेकेदार तालुक्यातून अनधिकृतरित्या सदर मालाची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्या संदर्भातील तालुकाबाहय़ वाहतूक करण्यास मनाई असल्याचे पत्रही या कंपनीला धाडले आहे, असे असताना ही वाहतुक बुधवारी स्थानिकांनी लक्ष देऊन अडवली.
कायद्याचे उल्लंखन केल्यास कारवाई अटळ
सदर कंपनीला केंद्र खालील गौण खनिज केवळ महाबळेश्वर- विटा रस्त्यासाठी वापरणे बंधनकारक आहे. यासंदर्भात तालुक्याच्या बाहेर गौण खजिना वाहतूक केली असेल तर त्यांच्यावर नक्की कारवाई करणार व चौकशी करणार. या संदर्भातले पत्रदेखील संबंधित कंपनीला दिले आहे. ठेकेदारांची मनमानी चालणार नाही असा खुलासाही तहसीलदार शरद पाटील यांनी दिला. कायदा सगळ्यांसाठी समान आहे कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ.
शरद पाटील, तहसीलदार