सात दिवस होम क्वारंटाईन ठेवावे : मनसे नेते उपरकर यांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गमध्ये येणाऱया चाकरमान्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या ई-पासची नोंदणी करण्यात यावी. ज्यांची घरे पूर्णत: रिकामी आहेत, त्यांना घरातच 7 दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यात यावे. ज्यांची व्यवस्था नाही, त्यांना लॉजिंग वा अन्य ठिकाणी क्वारंटाईन करण्यात यावे. चतुर्थीनिमित्त गावी येणाऱया चाकरमान्यांसाठी आताच क्वारंटाईनचे नियम जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उपरकर यांनी निवेदनात म्हटले आहे, जिल्हय़ात हजारो चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी कुटुंबियांसह येत असतात. जिल्हय़ातील चाकरमानी कितीही गरीब असला, तरीही तो वर्षातून एकदा गणपती सण साजरा करतो. मुंबईतील चाकरमानी हा बहुसंख्येने मंत्रालयीन विभाग, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध खासगी कंपन्यांतून नोकरीला आहे. कोरोनाच्या साथीच्या रोगामध्ये मुंबईमध्ये त्यांना तीन महिने क्वारंटाईनच करून ठेवल्याने त्यांची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. शिवाय आता त्यांना जास्तीत जास्त रजा घेणेही शक्य नसल्याने सात दिवसांचे होम क्वारंटाईन करून ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी विनंती आहे. जिल्हय़ातील कोरोना संसर्गाचे कारण दाखवून चाकरमान्यांना 14 दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन व त्यानंतर 14 दिवसांचे होम क्वारंटाईन करणे संयुक्तिक होणार नाही. घरगुती गणपतीसाठी अनेक चाकरमान्यांना पाच-सात दिवस रजा काढून यावे लागते. शिवाय दोन दिवस अगोदर येऊन आपली घरे साफसफाई व घरांची रंगरंगोटी करावी लागते. त्यामुळे चाकरमान्यांची अडचण लक्षात घेता, त्यांना सात दिवसांचे होम क्वारंटाईन करण्यात यावे. गणेश चतुर्थीनिमित्त गावी येणाऱया मुंबईकर-पुणे चाकरमान्यांसाठी आताच क्वारंटाईनचे नियम निश्चित करून तसे जाहीर करण्यात यावेत. म्हणजे गावी येणाऱया चाकरमान्यांना ई-पास काढणे, गाडय़ांचे बूकिंग करणे व आपल्या रजा मंजूर करून घेणे सुलभ होईल.