खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही चोरीचे प्रकार सुरू झाले आहेत. खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैल गावातील लक्ष्मी मंदिरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरी झाली. देवीच्या अंगावरील 5 तोळे सोन्याचे तसेच 15 तोळे चांदीचे दागिने असा एकूण तीन लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गणेबैल गावात एकच खळबळ निर्माण झाली.
गणेबैल गावातील लक्ष्मी मंदिर भरवस्तीत असून मंदिराच्या भोवताली घरे आहेत. रात्री 12 पर्यंत त्या ठिकाणी वर्दळ असते. यामुळे मध्यरात्रीनंतर चोरांनी मंदिराचा समोरील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. व त्या पाठोपाठ गाभाऱयाच्या दरवाजाचेही कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि देवीच्या गळय़ातील सोन्याचे हार, इतर दागिने तसेच चांदीचा कंबरपट्टा काढून घेऊन पलायन केले. शुक्रवारी सकाळी भाविक नेहमीप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याची माहिती तातडीने खानापूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार, पोलीस उपनिरीक्षक बसनगौडा पाटील व त्यांचे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करुन पंचनामा केला. आणि अधिक तपासणीसाठी बेळगावहून श्वान पथकही मागवण्यात आले. पण श्वान मंदिरापासून महामार्गापर्यंत गेले आणि पुन्हा मंदिराकडे आले. यामुळे त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही.
मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने पळवणारी व त्यांचे वाहन असलेली एखादी चोरांची सराईत टोळी असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. चार दिवसांपूर्वी खानापूर शहरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता चोरांनी ग्रामीण भागाकडेही आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे खानापूर पोलिसांसमोर तपास लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.