प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हय़ात दाखल झालेल्या 1 लाख 23 हजार 512 चाकरमान्यांपैकी अहवाल असलेल्यांची संख्या 55 हजार 986 आहे. त्यापैकी केवळ 35 जण कोरोना बाधित आढळले.
गणेशोत्सवासाठी जिल्हय़ात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल असलेल्यांची संख्या 55 हजार 986 आहे. जिल्हा प्रशासनाने लसीचे दोन डोस घेतलेले किंवा आरटीपीसीआर चाचणी केलेल्या चाकरमान्यांना प्रवेश देण्यात येईल, असे आदेश या काळात काढले होते. त्यात सुधारणा करुन चाचण्यांची अट शिथिल करतानाच चाकरमान्यांची जबाबदारी ग्रामकृती दलाकडे सोपवण्यात आली. चाकरमान्यांची नोंद करुन घेण्यासाठी जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांसाठी नोंदणी पथके ठेवण्यात आली होती. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जिल्हय़ात सुमारे 1 लाख 23,512 चाकरमानी आलेले होते. त्यापैकी चाचणी करुन आलेल्यांची संख्या 42 हजार 374 इतकी आहे. त्यात 12 हजार 964 आरटीपीसीआर तर 29 हजार 410 ऍण्टीजेन चाचण्या झालेले होते. जिल्हय़ात आल्यानंतर 13 हजार 612 चाकरमान्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 35 जण कोरोना बाधित आढळले. बाधितांमध्ये लांजा व रत्नागिरीत प्रत्येकी 2, चिपळूण 9, गुहागर 12 आणि दापोलीत 10 जणांचा समावेश होता.
जिल्हय़ात दाखल झालेल्या चाकरमान्यांची संख्याः
तालुका चाकरमानी
मंडणगड 7,830
दापोली 5,664
खेड 19,081
गुहागर 12,692
चिपळूण 11,069
संगमेश्वर 25,156
रत्नागिरी 20,035
लांजा 13,533
राजापूर 8,452