सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱयांचा आदेश, यापूर्वी जारी करण्यात आलेली मार्गसूची कायम
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या गणेशोत्सवाला पाच दिवसांचीच परवानगी दिली होती. संपूर्ण राज्यातून हिंदू संघटनांचा विरोध वाढताच सरकारने सोमवारी हा नियम शिथिल केला असून स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे.
महसूल विभागाचे मुख्य सचिव तुषार गिरीनाथ यांनी बुधवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. मूर्तीची उंची व उत्सव किती दिवसांचा असावा, याविषयीचा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱयांनी घ्यावा, असे सूचित केले होते. या सूचनेवरून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सायंकाळी अधिकृत आदेश जारी केला आहे.
पाच दिवसांचा नियम रद्द करण्यात आला असला तरी यापूर्वी जारी करण्यात आलेली मार्गसूची कायम ठेवण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने मुभा दिली आहे. बहुसंख्य गणेश महामंडळांनी केवळ पाच दिवस परवानगी देणार असाल तर तुम्हीच विसर्जन करा, अशी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे सरकारने हा नियम शिथिल केला आहे.