कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून आदेश नसल्याचे स्पष्टीकरण
अजय कांडर / कणकवली:
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे वाहतूक सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाला कोणतीही अडचण नाही, असे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी सांगितले. मात्र, कोकण रेल्वे गाडय़ा सुरू होण्यासंदर्भात अजून कोणताही आदेश वरिष्ठ पातळीवरून आला नसल्याचे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या सद्यस्थितीला समजून न घेता, राज्य शासन कोकण रेल्वे सुरू करण्याचे वक्तव्य करत आहे, असा आरोप यापूर्वी होत होता. मंगळवारी परिवहनमंत्र्यांनी शासन गणेश चतुर्थीला कोकण रेल्वेच्या गाडय़ा सुरू करण्यासंदर्भात अनुकूल असल्याचे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला असता, गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाडय़ा सोडण्यासंदर्भात आम्हाला अद्याप कोणतेच आदेश प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले.
गणेशोत्सवाला अवघे दहा दिवसच उरल्यामुळे चाकरमान्यांना येण्याची वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे अपेक्षितच आहे. कोरोनामुळे चाकरमानी येण्याची मर्यादा स्पष्ट होत असली, तरी ज्यांचे घर बंद असते, त्या घरातील सर्व कुटुंब गणेशोत्सवाला येणार हे निश्चित आहे. गणेशोत्सवाला मुंबईहून गावी येणाऱया भक्तांची संख्याही विपूल आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सुरू होणार, अशी अपेक्षा चाकरमानी बाळगून होते. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने चाकरमान्यांना एसटी किंवा खासगी वाहतुकीवर अवलंबून राहवे लागणार आहे.
या सगळय़ात राज्य शासन करत असलेली वक्तव्ये चाकरमान्यांना गोंधळात टाकणारी आहेत. मुख्यमंत्र्यांनी याच महिन्यात कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱया चाकरमान्यांच्या वाहतुकीचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोकणात रेल्वे गाडय़ा चालविण्यात याव्यात, असे पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मध्य रेल्वेला पाठविले. या पत्रानुसार मध्य रेल्वेने 200 गाडय़ांचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे पाठविला, असे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून गणपतीसाठी वाहतूक सुरू होऊ शकते, असे अनेकांना वाटायला लागले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट हा गावी येऊन होम क्वारंटाईन राहण्याचा शेवटचा दिवस. त्यानंतर यायचे असल्यास कोविड स्वॅब टेस्ट गरजेची असल्याचे सांगण्यात आले. अशावेळी कोकण रेल्वेच्या प्रतीक्षेत राहणाऱया चाकरमान्यांनी आपली स्वतंत्र वाहतुकीची व्यवस्था करणे अनिवार्य झाले आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. तरीही चाकरमानी कोकणात येत आहेत.