जिल्हा प्रवेशाच्या 48 तास अगोदर कोव्हिड टेस्ट केल्यास क्वारंटाईन नाही : जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत मागण्या – खासदार विनायक राऊत
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना 14 दिवसाऐवजी 10 दिवस क्वारंटाईन करण्यात यावे, 48 तास अगोदर कोव्हिड टेस्ट करुन येणाऱया व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येवू नये, सवलतीच्या दरात एसटी सोडाव्यात अशा महत्वाच्या मागण्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत मांडण्यात आल्या. या मागण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या बैठकीचे व्हायरल झालेल्या वृत्तानुसार जिल्हय़ात प्रवेश बंदी घातली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.
व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधिक्षक दिक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, रुची राऊत, आरोग्य अधिकारी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर खास.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमिवर शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्दय़ावर चर्चा करताना गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. परंतू ते इतिवृत्त होते त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही. त्यात बदल सुचविण्यात आले आहेत. शासनाच्या मान्यतेनंतरच अंतिम आदेश होणार असल्याचे खासदारांनी प्रथम स्पष्ट केले.
कोकणातील लोकांचा गणेशोत्सव हा मोठा सण असतो. त्यामुळे चाकरमानी हे येणारच त्यांना अडवता येणार नाही. मात्र शासनाचे नियम पाळावेच लागतील त्यात काहीसा बदल शांतता कमिटीमध्ये सुचविण्यात आली आहे. प्रामुख्याने जिल्हय़ाबाहेरुन येणाऱया चाकरमान्यांना 14 दिवसाऐवजी 10 दिवसच क्वारंटाईन करण्यात यावे. या दहा दिवसामध्ये 7 दिवस घरातील स्वतंत्र रुममध्ये किंवा शाळा व अन्य ठिकाणी क्वारंटाईन उर्वरित तीन दिवस घरातच फिरता येईल. मात्र लोकांच्या संपर्कात येता येणार नाही. त्यामुळे 14 दिवस क्वारंटाईन करण्यात यावे, तसेच आयत्यावेळी येणाऱया चाकरमान्यांनी 48 तास अगोदर कोव्हिड टेस्ट केलेली असेल तर त्याला क्वारंटाईन करण्यात येवू नये कोव्हिड टेस्टसाठी अडिज हजार रुपये घेतले जातात ते एक हजार रुपये घेण्यात यावेत.
जिल्हय़ात जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांना येण्याजाण्यासाठी एसटी सवलतीच्या दरात सोडावेत, ई-पास सहज उपलब्ध करुन देण्यात यावेत, येणाऱया वाहनांना टोलमाफी द्यावी, गणेश विसर्जनाच्या वेळी दहा ते वीस लोकांसाठी परवानगी द्यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी या मागण्यांना सकारात्मकता दर्शविली असून या मागण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आसून त्या मागण्या मान्य झाल्यावर जिल्हाधिकारी आदेश काढणार आहेत.
गणेशोत्सव हा पारंपारिक सन आहे. त्यामुळे मानुस कुठेही दूर असला तरी गणेशोत्सवाला घरी येतो. बंद घरे असतात त्यांना गणेशोत्सवासाठी येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा प्रवेश बंदी घालता येणार नाही. मात्र चाकरमान्यांनीही प्रशासनाला सहकार्य करायला हवे, लवकर यायला पाहीजेत, जिल्हय़ातील सर्व सरपंच व ग्रामकमिटय़ांनी यापूर्वी चांगले काम केले आहे. गणेशोत्सव कालावधीमध्येही तसेच सहकार्य अपेक्षित आहे. काही कुटूंबांचा सामुदायिक गणपती असतो, त्याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने सहकार्य केले पाहीजे. जनतेला त्रास होऊ न देता गणेशोत्सव केला पाहीजे. सामुदायिक आरत्या, भजने याबाबतही निर्बंध पाळायला हवेत. याबाबतही चर्चा झाल्याची माहिती खास.राऊत यांनी दिली आहे.
गणेशोत्सव काळात कोव्हिड टेस्टचे प्रमाण वाढविण्यासाठी पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्येही टेस्ट कराव्यात, टूनॅट मशिनचाही वापर करावा अशी सूचना मांडल्याचे राजन तेली यांनी सांगितले. तर कंटेन्मेंट झोन हा ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडला त्या घरापुर्तीच करावा अशी सूचना अमित सामंत यांनी मांडली. तर परिस्थिती हाताळून उत्सव साजरे करावेत अशी सूचना चंद्रकांत गावडे यांनी मांडल्याची माहिती दिली.