आरोग्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे उमटले पडसाद : काँग्रेस, निजद आमदारांकडून डॉ. सुधाकर यांच्या राजीनाम्याची मागणी
प्रतिनिधी / बेंगळूर
वादग्रस्त सीडी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच मानहानी होईल असे वृत्त प्रसारित करण्यावर न्यायालयामार्फत निर्बंध आणलेल्या सहा मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी करून काँग्रेस आमदारांनी विधानसभेत बुधवारी देखील आंदोलन केले. दरम्यान, सर्व आमदारांच्या वैयक्तिक जीवनाविषयी चौकशी व्हावी, असे वादग्रस्त विधान आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. या विधानाचे पडसादही विधानसभेत उमटले. काँग्रेस आमदारांनी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने सभागृहात गदारोळ माजला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब केले.
भोजन विरामानंतर दुपारी 3 वाजता विधानसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. त्यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांनी 224 आमदार हरिश्चंद्र आहेत का?, असे सांगून हक्कभंग केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी डॉ. सुधाकर यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सिद्धरामय्या यांनी गृहमंत्र्यांना धारेवर धरले. दरम्यान, आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी, आपण 32 वर्षांपासून विधानसभेचा सदस्य आहे. या कालावधीत कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही, असे सांगितले. बेजबाबदार विधान केलेल्या डॉ. सुधाकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी निजद आमदार बंडेप्पा काशेमपूर यांनी केली. यावेळी अनेक आमदारांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. त्यामुळे सभाध्यक्ष कागेरी यांनी विधानसभेचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकले.
आरोग्यमंत्र्यांनी अखेर मागितली माफी
राज्यातील सर्व 224 आमदारांच्या वैयक्तिक जीवनाविषयी चौकशी व्हावी, असे वादग्रस्त विधान केल्याने याविषयी तीव्र पडसाद उमटल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विट करताना आपल्या विधानामुळे आमदारांची मने दुखावली असतील तर आपण माफी मागतो. सर्व आमदारांची मने दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. आपल्या गटातील 17 आमदारांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱया नेत्यांबद्दलच आपण विधान केले आहे, अशी सारवासारवही सुधाकर यांनी केली आहे.