यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने : तरुणाईमध्ये नाराजी, कोरोनामुळे सर्वांच्याच हौसेवर, आनंदावर, सणांवर विरजण
प्रतिनिधी / बेळगाव
गरब्याच्या तालावर ठेका नाही… दांडियाचा (टीपरीचा) नाद घुमणार नाही… घुंगुरांचा व पैजणांचा छमछमाट नाही… तरुण-तरुणींच्या चैतन्याची सळसळ दिसणार नाही. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव तरुणाईसाठी हर्षाचा असणार नाही. अर्थात ही केवळ तरुणाईचीच नव्हे तर एकूण समाजाचीच अवस्था आहे. कोरोनाने सर्वांच्याच हौसेवर, आनंदावर, सणांवर विरजणच घातले आहे.
सर्व महिलांचा लाडका शारदोत्सव यंदा मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ शकत नाही. मंदिरांमध्ये नवरात्रीला होणारे भजन, कीर्तन, संगीताच्या मैफली होणार नाहीत. टाळ मृदंगाचा आवाज घुमणार नाही. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होईल. परंतु त्याच कारणामुळे आजपर्यंत सहन केलेल्या कोरोनाबद्दल संताप वाढू लागला आहे.
कोणताही सण आणि उत्सव हा अर्थचक्राला चालना देतो. नवरात्रमध्ये खेळल्या जाणाऱया दांडियामुळे बुरुड व्यवसायाला गती प्राप्त होते. टिपऱयांची मोठी विक्री होते आणि त्यांच्या खिशात चार पैसे खेळू लागतात. यंदा हा समाज या आर्थिक लाभापासून काही अंशी मूकणार आहे. तर याच निमित्ताने सर्वत्र पोषाख विक्री करणाऱया लोकांना सुद्धा आर्थिक लाभ होत असतो. मात्र गरबा-दांडिया खेळला जाणार नसल्याने हे पोषाख तसेच पडून आहेत. शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त किंवा वेशभूषा स्पर्धेच्यानिमित्ताने या पोषाखांना मागणी असायची. मात्र गेल्या मार्चपासून ही मागणीच नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
दरवषी नवरात्रीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यांना सुद्धा यावषी मर्यादा आल्या आहेत. मिरवणूक, पालखी अशा सर्व सार्वजनिक सोहळय़ांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे विविध मंदिर आणि धार्मिक संस्थांच्या संचालकांवर नवरात्र अत्यंत साधेपणाने साजरी करण्याची जबाबदारी आली आहे.
कोरोना त्यातच पाऊस यामुळे वातावरण बदलले आहे. सततच्या पावसाने बेळगावकर वैतागले आहेत. त्यातच नवरात्र उंबरठय़ावर येवून ठेपली असली तरी यावषी तिचे आचरण साधेपणानेच करावे लागणार आहे. घरोघरी देवीची श्रद्धापूर्वक पूजा केली जाईल. परंतु जल्लोश, उत्साह असे काही यंदा पहायला मिळणार नाही. या सर्व जल्लोशाला कोरोनाचे गालबोट लागले आहे.
देवीने जसा असुरांचा नाश केला आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला त्याप्रमाणेच आता देवीनेच कोरोनाचा नाश करावा आणि तमाम मानवी समूहाला दिलासा देत सण-वार उत्साहाने साजरे करण्यासाठी आश्वस्त करावे हीच भावना सर्वत्र पहायला मिळत आहे.