कोरोना संसर्गामुळे गर्भपात होण्याची देशातील पहिलीच घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.
मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणार्या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. संसर्ग गर्भातील गर्भापर्यंत पोहोचल्याने 13 आठवडय़ाच्या गर्भाचा मृत्यु झाला.
आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थने याविषयीचे संशोधन केले आहे. संशोधकांच्या मते महिलेच्या गर्भनाळेमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे.
सदर महिला मुंबईच्या सरकारी रूग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होती. गर्भावस्थेतील पहिल्या तिमाहीत तिला कोरोनाचा संसर्ग झाला परंतू त्याची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.
रूग्णालयात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कर्मचार्यांच्या तपासणीमध्ये या महिलेला कोरोना झाल्याचे सांगितले गेले.
या महिलेला रूग्णालयातच आयसोलेशन किंवा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दोन आठवडय़ानंतर जेव्हा महिलेचा अहवाल निगेटीव्ह आला तेव्हा तिची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यु झाला होता.
संशोधन अहवालानुसार अर्भकाच्या काखेत हायड्रॉप्स
फेटेलिस झाला होता. या स्थितीत शरीरात असामान्यपणे द्रव पदार्थ जमा होतो. सूज आल्याने असे होते.
नॅशनल इन्स्टीटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थमधील तज्ञांच्या मते, या महिलेवर उपचारानंतर तिची अनेकदा कोरोना संसर्गाची चाचणी केली होती. त्यामध्ये अहवाल निगेटीव्ह आला होता. याचा अर्थ असा होऊ शकतो की महिलेच्या घसा आणि नाक इथून विषाणू निघून तो गर्भापर्यंत पोहोचला.
गर्भनाळ, गर्भजल आणि फीटल मेम्ब्रेन या सर्वांची तपासणी करण्यात आली. यापैकी गर्भनाळ आणि गर्भजल या दोन्हीमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे.
ही गोष्ट धक्कादायक आहे. गर्भनाळ ही गर्भाची रक्षक असते. बाहेरच्या कोणत्याही संसर्गापासून बचाव करण्याचे काम गर्भनाळ करत असते. पण काही संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की गर्भजलामध्ये मोठय़ा संख्येने विषाणू मिळू शकतात.