आयपीएल स्पर्धेत बायो-बबल अर्थात जैवसुरक्षित वातावरणात प्रदीर्घ काळ राहणे मानसिकदृष्टय़ा खूप कठीण, आव्हानात्मक होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात खेळाडूंनी, सहायक घटकांनी जी सहकार्याची भूमिका पार पाडली, याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले. दुबईत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी मात करत झळाळत्या चषकावर आपले नाव कोरले, त्यावेळी यंदाच्या हंगामाची सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर गांगुली बोलत होते.
यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह, दुबई व अबु धाबी या 3 ठिकाणी खेळवली गेली आणि सहभागी संघातील सर्व खेळाडूंना, संलग्न घटकांना बायो-बबलची नियमावली पाळणे बंधनकारक होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनीही गांगुली यांच्याशी सहमती दर्शवली व पुढील हंगामातील स्पर्धा नेहमीप्रमाणे भारतातच आयोजित केली जाईल, असे अभिवचन दिले.
यंदा हंगामाच्या प्रारंभी चेन्नई पथकातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. पण, तो अपवाद वगळता पूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स या संघांनी प्ले-ऑफ गाठली तर कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स यांचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला.