वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेटला सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यासारखे जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू लाभले. हेच दोघे दिग्गज खेळाडू आता प्रशासनातही महत्त्वाच्या ठिकाणी आहेत. भविष्यात ते लक्षवेधी योगदान देतील, असा विश्वास भारताचा माजी कसोटीपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने व्यक्त केला.
माजी कर्णधार सौरभ गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद भूषवित आहेत तर राहुल द्रविड बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भूषवित आहेत. ही दोन्ही पदे भारतीय क्रिकेट प्रशासकीय विभागातील महत्त्वाची आहेत.
द्रविड आणि गांगुली यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत कसोटीमध्ये लक्षवेधी योगदान दिले. त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाचा कसोटीतील दर्जा निश्चितच उंचावला, असेही लक्ष्मणने म्हटले आहे. राहुल द्रविड क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो आता यशस्वी क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही नावारुपाला आला. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताला अनेक नवोदित क्रिकेटपटू मिळाले आहेत. 1996 साली गांगुली आणि द्रविड यांनी इंग्लंडविरूद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. लॉर्डस्च्या सामन्यात गांगुलीने पदार्पणातच शानदार शतक (131) झळकविले होते. याच सामन्यात गांगुलीनंतर द्रविडनेही आपले पहिले कसोटी शतक झळकविले. भारतीय संघातील द्रविडला फलंदाजीची भक्कम भिंत म्हणून ओळखले गेले असेही लक्ष्मणने म्हटले आहे. .