माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचे उद्गार
प्रतिनिधी/ पणजी
महात्मा गांधी यांनी इतरांचे दुःख हे आपलेच दुःख आहे हे समजून घेण्याची ताकद समाजाला दिली. सर्वसामान्य माणूसही आपल्या ताकदीनुसार समाजासाठी बरेच काही करू शकतो ही दृष्टी गांधींनी दिली असे उद्गार गोवा प्रदेश काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी पुण्यतिथीच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.
यावेळी पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, खजिनदार शंभू भाऊ बांदेकर व इतर नेते उपस्थित होते. गांधींनी कोणतेही शस्त्र हाती न घेता कसे लढावे याचा धडा दिला. जागतिक पातळीवर भारताचे नाव गांधींमुळे पोहोचले आहे. गांधी माहिती नाहीत असा जगातील एकही देश नसेल. गांधी विचारांमध्ये सर्वांना सोबत एकत्र घेऊन जाण्याची ताकद आहे असे मत खलप यांनी यावेळी व्यक्त केले.