उचगांव / वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथील अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले हरेश इंद्रजीत चोइथरामाणी (वय ३७) यांना उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून 40 हजारांचा धनादेश तत्काळ मदत म्हणून मिळाला. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रयत्न केले.
हरेश चोईथरामानी यांच्या डोक्याला अपघातामध्ये गंभीर जखम झाली होती. कोल्हापुरातील लालबहादूर शास्त्री नगरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता शस्त्रक्रियेसाठी त्यांना मोठा खर्च येणार होता. म्हणून गांधीनगरचे माजी ग्रामपंचायत सदस्य धीरजकुमार तेहल्याणी व ग्राहक सेनेचे जितू कुबडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे मदतीसाठी प्रयत्न केले. मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निधीमधून तत्काळ मदत म्हणून ४० हजारांचा धनादेश मिळवून दिला. त्यामुळे हरेश चोइथरामानी यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले.