शिवराम दळवी यांची मागणी
वार्ताहर / सावंतवाडी:
महामार्गासाठी जागा गेलेल्या शेतकऱयांना रेडी रेकनरनुसार भरपाई मिळत आहे. गावागावात जिल्हा परिषद, राज्य शासनाचे रस्ते होत आहेत. या रस्त्यासाठी जागा संपादन करताना महामार्गाला जशी रेडी रेकनरनुसार भरपाई दिली जाते, त्याप्रमाणे भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार शिवराम दळवी यांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने आता रस्ते विकासासाठी नवे धोरण आखावे. गावागावात होणाऱया रस्त्यांसाठी नुकसान भरपाईची तरतूद करावी. यासाठी प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावचा रस्ता राज्य शासन अथवा जि. प. च्या ताब्यात असेल आणि तो आठ व दहा फुटावरून 12 फूट करायचा असेल तर शेतकऱयांना कुठलीही कल्पना न देता ती जागा संपादीत केली जाते. गावातून रस्ता काढायचा असेल तर जागा संपादन करताना ग्रामपंचायत 23 नंबरचा अर्ज/ठराव झाला की, तेथे रस्ता केला जातो. मात्र, शेतकऱयांना काहीच मिळत नाही. त्यामुळे गावातील रस्त्यांसाठीही तशी तरतूद शासनाने करावी. शासनाने याबाबत पावले न उचलल्यास चळवळ उभारू व वेळ पडल्यास न्यायालयातही याचिका दाखल करू, असे दळवी यांनी स्पष्ट केले. गावागावातील जमिनी परप्रांतीय लोक विकासाच्या नावाखाली घेत आहेत. रस्ते विकसित करताना जमीनधारकांना काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाने गावातील शेतकऱयांनाही रेडी रेकनरनुसार भरपाई देण्यात यावी, याकडे दळवी यांनी लक्ष वेधले आहे.