वृत्तसंस्था/ नागपूर
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात शुबमन गिल की सूर्याला पसंती मिळेल हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनलेला असून कर्णधार रोहित शर्माने त्याबाबतीत चित्र स्पष्ट करणे टाळले आहे. रोहितला सूर्यकुमार यादव व शुभमन गिल यांच्यापैकी कुणाची निवड करण्यात येईल असे विचारण्यात आले. कारण संघ व्यवस्थापन फार्मात नसलेला उपकर्णधार राहुलला वगळणार नाही याचे पुरेसे संकेत मिळालेले आहे. मात्र रोहितने प्रश्नाचा रोख ओळखून आज नाणेफेकीच्या वेळी 9 वा. संघ निवड स्पष्ट होईल असे सांगितले.
शुभमन गिलचा दणदणीत फॉर्म जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादवची नॅथन लियॉनसारख्या फिरकी गोलंदाजावर वर्चस्व गाजविण्याची क्षमताही नजरेआड करता येणार नाही. भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले आहे की, संघाची निवड करताना सातत्यपूर्ण कामगिरीवर जितका जोर दिला जाईल तितकाच भर खेळपट्टीच्या अनुरूप कौशल्यांवर दिला जाईल. निवड करणे एक कठीण होणार आहे. आम्हाला माहीत आहे की, बरेच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हे संघासाठी चांगले लक्षण आहे, असे रोहित म्हणाला.
‘आम्हाला प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी जाऊन खेळपट्टी पाहून सर्वोत्तम अकरा खेळाडू निवडावे लागतील. आम्ही भूतकाळात ते केलेले आहे आणि यापुढेही आम्ही तेच करणार आहोत,’ असे रोहितने स्पष्ट केले. खेळपट्टीनुसार गरज पाहून आम्हाला खेळाडू उतरावे लागतील. आम्ही खेळाडूंशी याबद्दल बोललो आहोत. आम्हाला परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागेल आणि योग्य खेळाडू कोण आहेत हे पहावे लागेल. म्हणून आम्ही सर्व पर्याय सध्या खुले ठेवले आहेत’, असे त्याने सांगितले.
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांनाही रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत खेळवायला हवे असाही एक मतप्रवाह आहे. त्याबद्दल बोलताना रोहितन चौघांचेही कौतुक केले. ‘हे चौघेही दर्जेदार गोलंदाज आहेत आणि जडेजा व अश्विन एकत्र खूप खेळले आहेत. अक्षर आणि कुलदीप यांनी त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा फलंदाजांवर दबाव आणलेला आहे’, असे तो म्हणाला. सर्व चारही फिरकीपटू उपलब्ध असणे हे एक उत्तम लक्षण आहे आणि त्यापैकी तीन दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. कुलदीपने बांगलादेशमध्ये आमच्यासाठी महत्त्वपूर्ण धावाही केल्या, याकडे रोहितने यावेळी लक्ष वेधले.