अहमदाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक लोक एकूण पडले आहेत. पुरामुळे रस्त्यांवर वाहून जाणाऱ्या गाड्या, पाण्यात बुडालेली घरं आणि मदतीची वाट पाहणारे लोक हेच चित्र सध्या गुजरातमध्ये दिसत आहे. परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की रेस्क्यु ऑपरेशनसाठी हेलकॉप्टरचीही मदत घ्यावी लागत आहे.
गुजरातच्या जामनगर, राजकोट, जुनागडमध्ये तुफानी पाऊस झाला आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. सर्वात वाईट परिस्थिती ही जामनगरची पाहायला मिळते आहे. जामनगरमध्ये तब्बल ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. NDRF ची ६ पथकं इथं रवाना करण्यात आली आहेत. हेच नाही तर हवाई दलाची ४ हेलिकॉप्टर्सही बचाव कार्य सुरू आहेत. पुराच्या पाण्यात फसलेल्या लोकांची प्रशासनाकडून सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जामनगर जिल्ह्यातील १८ धरणं आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा बहुतांश भाग हा पाण्याखाली गेला आहे. कित्येक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं आहे. पुरापासून वाचण्यासाठी अनेकांनी घरांच्या छतावर आसरा घेतला आहे. मात्र, मुसळधार पाऊस काही थांबत नाही आहे, आणि पुराचं पाणी सतत वाढत आहे. त्यामुळे अनेकजण भीतीच्या छायेखाली आहेत. त्यांनाच सोडवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून केलं जातं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या ओव्हरफ्लो झाल्या आहे, अनेक नद्या आपलं पात्र सोडून वाहत आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी भीषण झाली आहे. नद्यांची वाढलेली पाणी पातळी पाहता अनेक गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. हेच नाही तर लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.