हे जिन्होंने सजाये यहाँ मेले, सुखदुख संग-संग झेले
वही चुनकर खामोशी यूँ चले जाए अकेले, कहाँ?
या हृदयस्पर्शी ओळी लिहिणारे गीतकार योगेश दूरच्या प्रवासाला निघून गेले आहेत. जिन्दगी ही पहेलीच अशी आहे, की ती कधी हसवते आणि कधी रडवते. ‘आनंद’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि सुमिता संन्याल मुंबईच्या समुद्र किनाऱयावर एकमेकांना भेटायला येतात. तेव्हा त्याच्या बरोबर चित्रपटाचा नायक आनंद, म्हणजे राजेश खन्नाही असतो. तो त्यांना म्हणतो, ‘तुम्ही एकमेकांशी गुजगोष्टी करा. मी जरा जाऊन येतो’. असे म्हणून तो फुग्यांचा एक गुच्छच घेतो आणि किनाऱयावरून चालत चालत हे गाणे म्हणतो अन् हवेत फुगे सोडून देतो. आनंद असाच हे जग लवकर सोडून निघून जातो. आता हे गीत लिहिणारे योगेशही त्याच प्रवासाला निघून गेले आहेत…
योगेशजींचे वैशिष्टय़ म्हणजे, ट्रकच्या मागे ज्या इंटरेस्टिंग काव्यपंक्ती असतात त्याही त्यांनी एकेकाळी लिहून दिल्या आहेत. ट्रकच्या मागे गीतांचे मुखडे लिहिणारा माणूस पुढे कधीकाळी प्रसिद्ध चित्रपटगीतकार होईल, हे कुणाला वाटले तरी असते का?
ये दिन क्मया आये लगे फूल हँसने
देखो बसन्ती बसन्ती हुए सारे मेरे सपने
बासू चटर्जी यांच्या ‘छोटी सी बात’ साठी योगेशजींनी हे गाणे लिहिले आणि सलील चौधरींनी त्याला संगीत दिले. हे गाणे मुकेशने गायिले होते. 1963 साली ‘सखी रोबिन’ या चित्रपटासाठी त्यांनी आपले पहिले गीत लिहिले. त्यानंतर ‘आनंद’ चित्रपटातली योगेश यांची गीते तर खूपच गाजली. सुमारे दोन-तीन वर्षापूर्वी ‘अँग्रेजी में कहते हैं’ या हरीश व्यास दिग्दर्शित चित्रपटासाठी योगेश यांनी तीन गाणी लिहिली होती. हा सिनेमा तसा कुणालाच माहीत नाही. पण हरीश हा योगेश यांना प्रथम भेटला, तो 1997 साली, एक फॅन म्हणून. त्यांची गाणी ऐकता ऐकता तो मोठा झाला. ‘माझा ‘अँग्रेजी में कहते हैं’ हा चित्रपट सामान्यजनांचे रोजरहाटीचे जीवन दर्शवणारा होता आणि योगेशजींच्या गीतांमध्ये आणि आदमीचीच स्पंदने ऐकू येत असत’, असे हरीश म्हणतो. तो असेही सांगतो की, ‘वो बात को घुमाफिरा के लहजे में नहीं कहते थे. सीधी बात सीधे शब्दों में कहते थे.’ हे अगदी शंभर टक्के खरे होते. योगेशजी मुंबईत गोरेगावला राहायचे. ‘जो देखता था, जो जीता था, वही लिखा है’, असे ते म्हणायचे. घराच्या बाल्कनीत बसून ते सूर्यास्त बघत असत. त्यामधूनच त्यांना ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ हे गीत स्फुरले. काव्यप्रेरणेसाठी काश्मीरच्या खोऱयात किंवा हिमालयाच्या कुशीत जाण्याची त्यांना गरज भासली नाही. शहराच्या गजबजाटी जीवनात राहूनच त्यांनी लेखन केले. मी लोकांमध्येच राहतो, त्यांच्यात मिसळतो. त्यांच्यापासून मी दूर गेलो, तर मी लिहू शकणार नाही, असे योगेशजी म्हणत.
योगेश हे लखनौचे. त्यांचे मूळ नाव योगेश गौड. त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजिनियर होते. त्यांच्या मृत्यूनंतर 17 वर्षांचा योगेश मुंबईला आला. तेव्हा त्यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण झाले होते. बँकेतल्या खात्यात फक्त पाचशे रु. होते आणि मोठय़ा कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. व्रजेंद्र गौड हे त्याकाळचे प्रख्यात चित्रपट कथा व संवाद लेखक, हे योगेश यांचे चुलतभाऊ. त्यांची मदत घेऊन चित्रपट निर्मितीच्या कुठल्यातरी विभागात काम मिळवावे, असा विचार योगेश यांच्या मनात तरळला. हा साधारण 1960 चा काळ. मुंबईत पहिला आठवडा त्यांनी चर्नी रोडच्या आर्य समाज धर्मशाळेत काढला. व्रजेंद्रजी त्यांना भेटायला आले होते, पण त्यांनी योगेशना कुठलीही मदत करण्याची तयारी दाखवली नाही. त्यानंतर महिना बारा रु. भाडय़ावर त्यांना अंधेरी स्टेशनजवळची झोपडी राहायला मिळाली. तेथे ना वीज होती, ना पाणी. योगेश यांनी कल्याण आणि बोरीबंदरच्या क्रॉफर्ड मार्केटला जाऊन पडेल ती कामे केली. ‘चक्रधारी’ सारख्या चित्रपटांतून एक्स्ट्रॉ म्हणून कामही केले. तोवर लिखाणाचा किडा वळवळत नव्हता. योगेश यांची आई काव्यप्रेमी होती. त्यामुळे त्यांना काव्याची उपजत आवड व समज होती. सत्यप्रकाश या जवळच्या मित्राने योगेशना कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. त्याच सुमारास योगेशजी ओशिवराच्या चाळीत राहायला गेले. तिथे अनेक धर्म व जातींचे लोक राहत होते. तिथे त्यांची गाठ ‘मेरे देश की धरती’ हे गाणे लिहिणाऱया गुलशन बावराशी पडली. योगेश यांच्या कविता वाचून त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. काही सिनेमावाल्यांच्या भेटीगाठी करून दिल्या. त्यामुळे ‘सखी रोबिन’ मध्ये सहा गाणी लिहिण्याची संधी मिळाली. त्याचे त्यांना 25 रु. मिळाले. त्यातले मन्ना डेने गायिलेले ‘तुम जो आ जाओ’ हे गाणे गाजले. त्यानंतर हळूहळू चित्रपट मिळत गेले. परंतु सलीलदांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे योगेश यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. शैलेंद्र हा पूर्वी सलीलदांचा गीतकार असे. त्याच्या निधनानंतर आनंद, सब से बडा सुख, अन्नदाता, रजनीगंधा, छोटी सी बात अशा चित्रपटांमधून ते व योगेश यांनी एकत्र काम केले. ‘छोटी सी बात’ मधील ‘न जाने क्मयूँ होता है ये जिंदगी के साथ’ या गाण्यात,
वही है डगर, वही है सफर,
है नहीं साथ मेरे मगर अब मेरा हमसफर,
इधर उधर ढूंढे नजर वही है डगर
अशी योगेश यांनी केलेली शब्दांची गंमत मस्त आहे किंवा ‘मंजिल’ या चित्रपटातील ‘रिमझिम गिरे सावन’ हे किशोरकुमारच्या सर्वोत्कृष्ट गीतांमधले एक असलेले गाणे योगेश यांनी लिहिले आहे. ‘रजनीगंधा’ मध्ये ‘कई बार यूही देखा है’ या गीतात, ‘मन की सीमारेखा’ या शब्दांची चपखल योजना त्यांनी केली आहे. ‘बातों बातों में’ मध्ये राजेश रोशनच्या टय़ूनवर ‘न बोले तुम, न मैंने कुछ कहा’ हे उडते गाणे रचणारे योगेशच. ‘मिली’ या चित्रपटात ‘बडी सूनी सूनी है’ आणि ‘आये तुम याद मुझे’ या किशोरकुमारच्या दोन्ही उदास गाण्यात योगेश यांनी सखोलता आणली. ‘अन्नदाता’ चित्रपटात ‘गुजर जाएँ दिन दिन दिन, तू हर पल गिन गिन गिन’ या गाण्यात त्यांनी धमाल उडवून दिली तर ‘ओ मेरी प्राण सजनी चम्पावती आ जा’ या हलक्मया बाजाच्या गाण्यात त्यांनी मजा आणली. मंजिलें और भी हैं, अनोखा दान, आनंद महल, मजाक, प्रियतमा, उस पार, हमारे तुम्हारे, शौ˜ाढाrन, लाखें की बात, पसंद अपनी अपनी अशा विविधरंगी चित्रपटांसाठी योगेशजींनी गीतलेखन केले. हृषिदा, बासू चटर्जी यांच्यासारख्यांच्या मुख्यतः जीवनाचे विविध रंग दाखवणाऱया चित्रपटांसाठी योगेशजींनी गाणी लिहिली. आता जुन्या पिढीचे सर्वच गीतकार निघून गेले आहेत. काव्याचे अस्तित्व गाण्यांमधून टिकवणाऱयांच्या मालिकेतले गुलजार, जावेद अख्तर यांच्यासारखे काहीचजण राहिले आहेत. ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ अशीच भावना अशावेळी मनात येते.
नंदिनी आत्मसिद्ध