भाजप जिल्हाध्यक्षांची माहिती : यात्रेतून एक हजार लोकांना रोजगार!
वार्ताहर / सावंतवाडी:
केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेसह सिंधुदुर्गात येत आहेत. त्यांचे जिल्हय़ात ठिकठिकाणी गुढी उभारून उत्सवासारखे स्वागत केले जाणार आहे. वारकरी तसेच सिंधुदुर्गातील सर्व कलाकार त्यांच्या स्वागतासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, पोलीस ज्या पद्धतीने वागत आहेत, ती पद्धत चुकीची आहे. एक दिवस आमचेही सरकार सत्तेवर असेल. त्यावेळी आम्ही निश्चितपणे पाहू. जिह्यात जमावबंदी आहे. मग पालकमंत्री, खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते या मंडळींना जमावबंदी नाही का? पोलीस भेदभाव करत आहेत.
राणे शुक्रवारी सायंकाळपासून सिंधुदुर्गात येत आहेत. शनिवार व रविवार या दोन दिवशी संपूर्ण जिह्यात राणे गावागावात जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे. या यात्रेच्या माध्यमातून जिह्यात जवळपास एक हजार लोकांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या आशीर्वादाची परतफेड केली जाणार आहे. तसे भाजपचे नियोजन आहे, असेही तेली म्हणाले.