ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडीतील नेत्यांचे नाराजी नाट्य सुरूच आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घटना सातत्याने घडत आहे. राज्यात अधिवेशनापासून गृहमंत्रालयाच्या कारवायांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यातच पेनड्राईव्ह प्रकरणात गृहमंत्र्यांची महत्वाची भूमिका राहिली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. तर भाजप राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप असतानाही गृहमंत्र्यांनी भाजपविरोधात मवाळ भूमिका घेतल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. यावरून शिवसेना नेते गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे वृत्त होते. यानंतर आज गृहमंत्री वळसे पाटील यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे नाराज आहेत या वृत्ताचे आता मुख्यमंत्री ठाकेर यांनी खंडन केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.
शिवसेना नेते गृहमंत्र्यांवर नाराज आहेत अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर कोणतेही शिवसेना नेते किंवा मी स्वतः नाराज नसल्याचे त्यांनी म्हण्टले आहे.