प्रतिनिधी / सातारा :
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई रविवारी सायंकाळी वॉकिंगसाठी निघालेले असताना दोन दुचाकीवरुन काही अनोळखी व्यक्ती त्यांच्यावर पाळत ठेवत होत्या. त्यातील एका दुचाकीवरील युवक त्यांचे व्हिडिओ शुटींग घेत होता. हा प्रकार लक्षात आल्यावर मंत्री देसाई यांच्या अंगरक्षकांनी हटकल्यानंतर अनोळखी गायब झाले. मात्र, आता या घटनेची पोलीस दलाने गंभीर दखल घेत ते अनोळखी कोण होते याचा शोध सुरु केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 13 रोजी सायंकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई त्यांच्या पोवईनाक्यावरील कोयना दौलत निवासस्थानातून नेहमीप्रमाणे वॉकिंगसाठी बाहेर पडले होते. ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना त्यांच्या मागून एक दुचाकी पुढे गेली. त्यावर दोन अनोळखी व्यक्ती होत्या. त्याकडे दुर्लक्ष करुन ते चालत असतानाच आणखी एक दुचाकी आली. ती हळूहळू चालवत दोन अनोळखी निघाले होते. त्यातील पाठीमागे बसलेला अनोळखी युवक त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत होता.ही बाब मंत्री देसाई यांच्या लक्षात आल्यावर ते सावध झाले. तोपर्यंत त्या दुचाकी पुन्हा फिरुन आल्या व पुन्हा गेल्या. त्यांनी अंगरक्षकांना ही बाब सांगताच अंगरक्षकांनी हटकण्याअगोदर त्या दोन्ही दुचाकी व अनोळखी गायब झाले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने मग मंत्री देसाई निवासस्थानी परतले. त्यांनी ही बाब पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांना सांगितली.
अजकुमार बंसल तसेच अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी तातडीने मंत्री देसाई यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. देसाई यांनी संबंधित घडलेला प्रकार वेगळा वाटत असल्याचे सांगितले. दरम्यान, सोमवारी मंत्री देसाई यांना काही सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. मात्र, त्यात त्यांना आढळलेल्या दुचाकी दिसत नव्हत्या. त्यामुळे पोलीस दलाकडून आता दुकानांनी बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास आरंभ केला असून हे पाळत ठेवणारे अनोळखी कोण हे लवकरच शोधून काढू असे सांगितले आहे.
अंगावर येईल त्याला शिंगावर घेवू
दरम्यान, राज्यातील काही पक्ष, संघटना मंत्र्यांवर पाळत ठेवा, त्यांच्याविरुध्द हिंसक कारवाया करा अशी चिथावणी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा साताऱयात मंत्री देसाई यांच्याबाबत घडला आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळ व त्यातील मंत्री सक्षम आहेत. मंत्री हे जनतेचे लोकप्रतिनिधी असतात. आक्षेपार्ह कृती घडल्यास त्याचे कायदेशीर उत्तर दिले जाईल. मी शिवसेनेचा मंत्री आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रसंगाला भीत नाही. अंगावर येईल त्याला शिंगावर घेवू, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.