बेळगावातील निवास्थानी पत्रकार परिषद
बेळगाव : राज्य सरकारने गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. या योजनांचा राज्यातील जनतेला लाभ घेता येणार आहे. मात्र या योजनांचा विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. आज बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुरुवातीला त्यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि या मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि ओडिशा सरकारने योग्य भरपाई देण्याची मागणी केली.
जारकीहोळी पुढे म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या आणि घोषणा केलेल्या विकासकामांचा सरकार आढावा घेईल आणि अनावश्यक कामे थांबविण्यात येतील. तसेच जनतेच्या फायद्याची कामे सुरु ठेवण्यात येतील. गॅरंटी योजना सुरु झाल्यानंतरही राज्यात काँग्रेस सरकार विकासकामांत खंड पडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्हा रुग्णालय आवारातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी काँग्रेसच्या काळातच तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. शरणुप्रकाश यांच्याहस्ते करण्यात आली होती. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आपणच करणार असल्याचे ते म्हणाले.
सत्तेत असताना भाजपवाल्यांना काहीच विकास करता आला नाही. आता आम्ही सत्तेवर आल्यावर ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आंदोलनाची भाषा करत आहेत. त्यांना आता काहीच काम उरलेले नाही. पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या, अशी बोचरी टीका त्यांनी भाजपवर केली.
बळ्ळारी नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
बेळगावातील येळ्ळूर ते बळ्ळारी नाल्याला प्रत्येक पावसाळय़ात पूर येऊन हजारो एकर शेती पाण्याखाली बुडून शेतकर्यांचे नुकसान होत आहे. शेतकर्यांची समस्या जाणून आहे. तेथे पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी करणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.