शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडणार – शंभूराज काटकर
प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप बंद पडले असून एलपीजी गॅसवर चालणाऱ्या 7000 रिक्षाचालकांना त्यामुळे त्रास होत आहे. हे पंप प्रशासनाने ताब्यात घेऊन सुरू करावेत किंवा पोलीस आणि एसटीच्या पंपावर गॅस ची सोय करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना सोमवारी भेटणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना काटकर म्हणाले, पेट्रोलचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा आधीच व्यवसाय कमी झाला आहे. मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालक एलपीजी किट असणाऱ्या रिक्षा घेत आहेत. सांगली आणि मिरज शहर परिसरामध्ये पाच गॅस पंप सुरू झाल्यामुळे जवळपास सात हजार रिक्षाचालकांनी एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा खरेदी केल्या आहेत. मात्र या पाचपैकी सांगलीवाडी आणि कोल्हापुर रोड येथील दोन गॅस पंप चालकांनी अचानकच बंद केले आहेत. आणखी एका पंपावर अनियमित पुरवठा असतो. त्यामुळे जुना कुपवाड रोड वरील गो गॅस आणि मिरज रोडवरील रिलायन्स पंपावर रिक्षाचालकांची मोठी गर्दी होत आहे. 7000 चालकांच्या मागणीला हे दोन पंप पुरेसे नाहीत.
त्यामुळे गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा मध्येच बंद पडत आहेत. दुसरा रिक्षा चालकाच्या मदतीने पाय लावून रिक्षा गॅस पंप पर्यंत ढकलत न्याव्या लागतात. मात्र त्यामुळे वाहतुकीस अडथळा केल्याची दंडात्मक कारवाई वाहतूक पोलीस करत आहेत. आधीच गॅस नसल्याने व्यवसाय बंद, त्यात रिक्षा ढकलत नेण्यासाठीचा भुर्दंड आणि वरून दंड यामुळे रिक्षाचालक कर्जबाजारी होत आहेत. वाहतूक पोलिसांची कारवाई थांबवावी, बंद असलेले गॅस पंप प्रशासनाने ताब्यात घेऊन सुरू करावेत, एस टी चे सांगली आणि मिरज एसटी डेपो मध्ये तसेच पोलिस मुख्यालयात असणाऱ्या शासकीय पंपावर प्रशासनाने रिक्षाचालकांना गॅसची उपलब्धता करून दिली तर या दोन्ही शहरातील रिक्षाचालकांची चिंता कायमची मिटणार आहे. शिवाय त्याचा फायदा सरकारी पंपानाही होईल.
दोन्ही शहरातील सात हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालकांचा असणारा हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान बंद असलेले पंपतरी तात्काळ सुरू झाले पाहिजेत. यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटणार असून यावेळी रिक्षाचालकांनी कोरोणाची स्थिती लक्षात घेऊन गर्दी न करता निवडक रिक्षाचालकांनी शिष्टमंडलात भेटायला यावे असे आवाहनही शंभूराज काटकर यांनी केले आहे.