डॉक्टरही हतबल, प्रत्येक वॉर्डात कोरोनाचे रुग्ण, शस्त्रक्रिया पूर्णता बंद, इस्पितळात येणाऱयांची परवड
प्रतिनिधी / पणजी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळातील व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने डॉक्टरही हतबल झाले आहेत. कोरोना रुग्ण आता प्रत्येक वॉर्डात आढळत आहेत. शस्त्रक्रिया तर पूर्णपणे बंद झाली असून कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीवर उपचार घेण्यासाठी गोमेकॉत येणाऱयांची परवड होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास इस्पितळ परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती इद्भवू शकते.
गोमेकॉतील बाहय़रुग्णसेवा अक्षरशः कोलमडली असून नेहमी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली जात असल्याचे दिसत आहे. फोन वरून आगावू अपॉईमेन्ट घेतलेल्यानाही ओपीडीमधून हाकलून दिले जात असून त्यांना रस्त्यावर तासनतास ताटकळत रहावे लागते. शेवटी डॉक्टर उपलब्ध नाहीत, म्हणून त्यांना घरी जावे लागते. रुग्णांची वाईट परिस्थिती असल्यास त्यांना आपत्कालीन कॅज्युली विभागात जाण्याचा सल्ला दिला जातो, पण तिथे बाहय़ रुग्ण विभागातील रुग्णांना विचारपूस करून त्या त्या वॉर्डात पाठवले जाते. वॉर्डमध्ये गेल्यास तेथील सुरक्षा रक्षक आधी कोविड चाचणी विचारतात. डॉक्टरला भेटायलाही दिले जात नाही. डॉक्टरना भेटायची अत्यावश्यकता व्यक्त केली तर काही जणांचे केस पेपर त्या प्रभागातील डॉक्टराना दाखवण्यास आत नेतात जी औषधे यापूर्वी दिली आहेत तीच औधषे चालू ठेवण्याचा सल्ला डॉक्टर त्या वॉर्डाच्या दरवाजावर राहून आतूनच देतात. रुग्णांना तपासणी आता गोमेकॉत जवळजवळ बंदच पडले आहे.
पाच दिवसात चाचणी अहवाल
कोरोनाची चाचणी करायचे केंद्र कुठे असा प्रश्न विचारीत फिरत असलेले अनेकजण गोमेकॉ परिसरात दिसतात. याचे कारण कोरोना चाचणी केंद्राचा फलक कुठेच लावण्यात आलेला नाही, कोणी 30 क्रमांकावर चला तर कोणी 148 क्रमांकावर चला तर कोणी 1 नंबरवर चला असे उत्तर देत असतो. ज्यांची चाचणी झाली त्यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांची चाचणी झाल्याचा लगेच एसएमएस येतो, पण ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळायला मात्र पाच दिवस लागतात. दिवसाला दोन हजार पेक्षा जास्त नमूने तपासण्याची क्षमता नाही, मात्र रोज पाच हजार नमूने तपासणीस येत असल्याने तपासणीला उशिर होत असल्याचे आढळले आहे.
चाचणी आरोग्य केंद्रातच
कोरोनाची चाचणी फक्त आरोग्य केंद्रातच केली जाते, गोमेकॉत फक्त वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची आणि त्याच्या सोबत रहाणाऱया नातेवाईकांची चाचणी घेतली जाते, वॉर्डमध्ये रुग्णाला दाखल केले तरी त्याच्या सोबत रहाणाऱया व्यक्तीला वॉर्ड बाहेरच रहावे लागते. तीन ते पाच दिवसानंतर चाचणी अहवाल आल्यानंतरच त्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो.
आरोग्य केंद्रावर तुफान गर्दी
पणजी व इतर आरोग्य केंद्रांवर कोरोना चाचणी साठी तुफान गर्दी असून चाचणीसाठी आलेल्या रुग्णांना आधी डॉक्टरर्स भेटावे लागते. तेथे चाचणी घ्यायची की नाही व घ्यायची तर कुठल्याप्रकाराची घ्यायची हे केस पेपरवर नमूद केले जाते, केस पेपरसाठी 20 रुपये द्यावे लागतात व हा केसपेपर नसेल तर आत प्रवेश दिला जात नाही. या आरोग्य केंद्रावर सकाळी 11 वा. केस पेपर देणे बंद करतात. केस पेपर देणे बंद करतात. त्यामुळे चाचणीसाठी आलेल्या रुग्णांची निराशा होते.
गोमेकॉत पार्किंग नाही
गोमेकॉतील पार्किंग व्यवस्था अत्यंत कमी असून या पार्किंगच्या जागेत टॅक्सीवाल्यांनी आपल्या कार आधिच लावून ठेवलेल्या असतात. काही कारवर येवढी धुळ साचली असून ही वाहने अनेक महिन्यापासून या ठिकाणी पडली आहेत हे जाणवते. गोमेकॉ बाहेर हमरस्त्याचे काम चालू असल्याने कार पार्किंग मिळत नाही व गोमेकॉच्या आत पार्किंग दिली जात नाही.
खासगी चाचणी 5 हजार रुपये
कोरोना चाचणी आरोग्य केंद्रात मोफत असली तरी खासगी लॅबमध्ये या चाचणीसाठी पाच हजार रुपये आकारले जातात, यापूर्वी या चाचणीसाठी 2 हजार 400 रुपये आकारले जायचे. पण कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मात्र चाचणीची फी वाढवण्यात आल्याचे जाणवले. काही पॅथॉलॉजीकल लॅब मध्ये वेगवेगळी फी असली तरी ती हजारो रुपयांच्या घरात आहे.
शववाहिकाही नाही
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा मृतदेह नातेवाईकांनी नेण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना शववाहिका उपलब्ध होत नाही. मयताच्या नातेवाईकांना खोटे बोलून शवाहिकेची व्यवस्था करावी लागते आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. चाचणीपासून जी लुट सुरु होते ती उपचारांवर आणि मृत्यू आलातरी लूट थांबत नाही.
दुसऱया लाटेतील कोरोना विषाणू घातक
दुसऱया लाटेतील कोरोना विषाणू फार घातक असून या विषाणूची बाधा होताच तीन दिवसांच्या आत छातीत फुफ्फुसामध्ये सर्दी भरते व एकदा फुफ्फुसात इन्फेक्शन झाले की ते बरे होत नाही. 7 दिवसात प्राणवायुचे प्रमाण कमी होऊ लागते. प्राणवायु कमी झाल्याने इतर अवयांवर परिणाम होतो. मुत्रपिंडांसह इतर अवयव निकामी होऊ लागतात. शेवटी नियोनियाच्या आजाराने रुग्ण दगावतो. या रुग्णाला तापाची लक्षणे असतीलच असे नाही, लक्षणे दिसताच पहिल्या दिवसापासूनच उपचार सुरू झाला पाहिजे, अन्यथा रुग्ण दगावू शकतो, असे गोमेकॉतील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.