कसोटी संघातून हार्दिक पंडय़ाला वगळण्याच्या निर्णयाला माजी निवडकर्ते सरणदीप सिंग यांचे समर्थन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी निवडकर्ते सरणदीप सिंग यांनी विद्यमान निवड समितीच्या हार्दिक पंडय़ाला कसोटी संघातून वगळण्याच्या निर्णयाला पाठबळ दर्शवले आहे. ‘हार्दिक जर त्याच्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण करत नसेल तर मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात देखील अष्टपैलू म्हणून त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकत नाही’, असे सरणदीप याप्रसंगी म्हणाले.
2019 मध्ये पाठीची शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर हार्दिक पंडय़ाने नियमितपणे गोलंदाजी केलेली नाही आणि गोलंदाजी करत नसल्याने इंग्लंड दौऱयासाठी भारतीय कसोटी संघात त्याचा विचार केला गेला नाही. सरणदीप यांची निवड समिती सदस्यत्वाची कारकीर्द या वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर पूर्ण झाली आहे. पृथ्वी शॉ याच्यात प्रचंड गुणवत्ता असताना त्याला राखीव खेळाडूतही स्थान मिळत नाही, याबद्दल सरणदीप यांनी येथे आश्चर्य व्यक्त केले.
‘हार्दिक पंडय़ाचा कसोटी संघात समावेश न करण्याचा निर्णय मी समजू शकतो. शस्त्रक्रियेनंतर तो नियमितपणे गोलंदाजी करु शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. वनडे क्रिकेटमध्ये 10 षटकांचा आणि टी-20 क्रिकेटमध्ये 4 षटकांचा कोटा पूर्ण करत असेल तरच त्याला अष्टपैलू या नात्याने संधी मिळू शकते. फक्त फलंदाज या नात्याने त्याचा संघात समावेश होऊ शकत नाही. कारण, जर गोलंदाजी करु शकत नसतानाही त्याला संघात घेतले तर समतोल बिघडू शकतो. अशा परिस्थितीत जादा गोलंदाज खेळवावा लागेल आणि सुर्यकुमार यादवसारख्या एखाद्या महत्त्वाच्या फलंदाजाला बाहेर ठेवावे लागू शकते. इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेप्रमाणे आपण 5 गोलंदाजांना घेऊन खेळू शकत नाही’, असे ते पुढे म्हणाले.
हार्दिक पंडय़ा अष्टपैलू म्हणून खेळू शकत नसेल तर त्याची जागा भरुन काढण्यासारखे वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर असे अनेक खेळाडू आहेत आणि आता रविंद्र जडेजा देखील परतला आहे, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. पृथ्वी शॉ हा सेहवागप्रमाणे आक्रमक फलंदाजाची जबाबदारी पार पाडू शकतो. त्यामुळे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे रास्त ठरत नाही, असा दावा सरणदीपनी केला.
इंग्लंड दौऱयासाठी निवड समितीने अभिमन्यू ईश्वरन, जलद गोलंदाज अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा व अरझान नागवासवल्ला यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली. या पार्श्वभूमीवर सरणदीप म्हणाले, ‘प्रियंक पांचाळने भारत अ संघातर्फे न्यूझीलंड दौऱयात शतक झळकावले. त्याला निवडले गेलेले नाही. धावांची आतषबाजी करणाऱया देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश नाही. डावखुरा गोलंदाज म्हणून जयदेव उनादकटला का स्थान दिले गेले नाही, याचेही आश्चर्य वाटते. मागील रणजी स्पर्धेत त्याने 67 बळी घेतले, हा एक विक्रम आहे. त्यातील बरेच बळी त्याने राजकोटच्या पाटा खेळपट्टीवर घेतले होते’.