निव्वळ गुंतवणूक 57 टक्क्यांनी घटली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)मधील निव्वळ गुंतवणूक 57 टक्क्यांची घट होत 288 कोटी रुपयांवर राहिली आहे. शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक गुंतवणूकदारांनी घटवली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एम्फी) यांच्या आकडेवारीनुसार गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक घटली असली तरीही गोल्ड ईटीएफच्या एयूएमच्या आधारे मे महिन्याच्या अखेरीस सहा टक्क्यांनी वाढून 16,625 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
आकडेवारीनुसार गोल्ड ईटीएफमध्ये मे महिन्यात निव्वळ स्वरुपात 288 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. एप्रिलमध्ये हा आकडा 680 कोटी रुपयांच्या घरात राहिला होता. गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 662 कोटी रुपये घातले होते. फेब्रुवारीत हाच आकडा 491 कोटी तर जानेवारीत 625 कोटी रुपयांवर राहिला होता.
गुंतवणूकदारांचा कल
मे महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक घटण्याचे प्रमुख कारण हे शेअर बाजारातील अस्थिर कामगिरी असून गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचा एक मोठा हिस्सा हा अलीकडच्या काळात समभाग आणि अन्य ठिकाणी वळवीत असल्याचे दिसून आले आहे.