नावावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आक्षेप : केंद्राला लिहिले पत्र
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राच्या (आरजीसीबी)च्या दुसऱया परिसराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांचे नाव देण्यात आल्याने वाद उभा ठाकला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारला याप्रकरणी पत्र लिहिले आहे. गोळवलकर यांच्याऐवजी एखाद्या प्रख्यात वैज्ञानिकाचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विजयन यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
तर गोळवलकर यांचे नाव देण्यात आल्याने काँग्रेस खासदार शशी थरूरही संतप्त झाले आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात गोळवलकर यांचे योगदान काय असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. एका मागोमाग एक अनेक ट्विट करत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
सांप्रदायिकतेचा आजार फैलावण्याच्या व्यतिरिक्त गोळवलकर यांचे विज्ञानाच्या क्षेत्रात काय योगदान आहे? तर राजीव गांधी यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संशोधनाला चालना दिली होती. संशोधनाकरता निधीही पुरविला होता. हिटलरचा प्रशसंक असलेला आणि स्वतःच्या संबोधनात विज्ञानावरील धर्माच्या वर्चस्वावर भर देणाऱया गोळवलकर यांच्या स्मृती केंद्र सरकार का जागवत आहे असे प्रश्नार्थक विधान थरूर यांनी केले आहे.
आरजीसीबीच्या नव्या परिसराच्या नामकरणासाठी थरूर यांनी डॉ. पलपु यांचे नाव सुचविले आहे. पलपु हे स्थानिक हीरो आहेत, ते एक समाजसुधारक होते आणि प्रख्यात बॅक्टिरियोलॉजिस्ट होते. गोळवलकर यांच्याजागी त्यांचे नाव देणे उत्तम ठरणार असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.