राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांचा पणजी येथे निर्धार
प्रतिनिधी / पणजी
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली गोव्याची ओळख कोळशामुळे पुसू देऊ नका, कोळशास जीव तोडून विरोध करा, आम्ही तुमच्यासोबत राहू, असे स्पष्ट आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्याचे प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी दिले.
पर्यटन उद्योगाद्वारेच गोव्याला नव्या भारताचा आधुनिक चेहरा बनवुया, असेही ते म्हणाले. कोरोना महामारीनंतर गोव्याच्या राजकीय पटलावर निधर्मी सरकार स्थापन होईल व एक नवी सुरुवात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त
केली.
पणजीत आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित असलेल्या या सभेच्या व्यासपीठावर पक्षाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमाव, निरीक्षक नरेंद्र वर्मा, सतीश नरियानी, संजय बर्डे, सेंड्रा मार्टिनी, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित
होते.
कोळशामुळे पर्यावरण नष्ट होईल
पर्यटन हा गोव्याचा आर्थिक कणा असून त्यात कोळशाची भर पडल्यास गोव्याचे पर्यावरण नष्ट होईल. पर्यटन नसेल तर गोव्याची अर्थव्यवस्था कोसळेल. एकेकाळी खाणी हा गोव्याचा आर्थिक कणा होता. त्या बंद पडल्यानंतर सारी भिस्त पर्यटनावर आली. परंतु कोरोनामुळे तोही बंद पडला.
आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊन पर्यटन उद्योग जरासा कुठे स्थिरस्थावर होऊ लागला असतानाच कोळशाचे भूत गोमंतकीयांच्या मानगुटीवर बसविण्याचे षड्यंत्र भाजप सरकारने आखले आहे.
गोव्याला कोळसा हब बनविण्याच्या या प्रयत्नांना सर्व थरातून विरोध होत असतानाही सरकार हट्टाला पेटले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता गोमंतकीयांच्या सोबत राहणार आहे, असे आश्वासन पटेल यांनी दिले.
काँग्रेस हा दुतोंडी पक्ष
गेल्या निवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांचे युती सरकार सत्तेवर येणार होते. परंतु काँग्रेसने खोडा घातला. तसेच बोलणी चालू असतानाच फॉरवर्डनेही आपल्या तीन आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला. आज काँग्रेसची दैनावस्था झाली आहे. काँग्रेस हा दुतोंडी पक्ष आहे. त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी टीका पटेल यांनी केली.
म्हादई गमावण्यास राणे जबाबदार : चर्चिल
चर्चिल आलेमाव यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस हा फटिंग पक्ष आहे, गोव्यात जे जे काही वाईट आले ते सर्व काँग्रेसनेच आणले, असे ते म्हणाले. गोव्यात पहिला पॅसिनो आणण्यास प्रतापसिंह राणे जबाबदार, म्हादई नदी गोव्याच्या हातातून जाण्यासही राणेच जबाबदार आहेत, असे दावे त्यांनी केले. एवढेच नव्हे तर गोव्यात रेल्वे डबल ट्रेकिंगचे समर्थन करणारे दिगंबर कामत सरकार आणि त्यांचे खासदार होते याचे पुरावे चर्चिल यांनी सभेत सादर केले.
पन्नास टक्के जागा मिळाल्या तरच युती
गोव्यात पर्यटन उद्योग वाढवा, अशी मागणी सर्व प्रथम करणारा आपणच होतो, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. अशावेळी गोव्याचा कोळसा हब झाल्यास पर्यटन उद्योग संपून जाण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गोव्याला कोळसा हब बनवू देणार नाही, असा निर्धार चर्चिल यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी, येत्या निवडणुकीत केवळ 50 टक्के जागा वाटप होत असेल तरच काँग्रेससोबत युतीचा विचार करावा, अन्यथा नको, असे आवाहन पटेल यांना केले.
पक्षाच्या महिला अध्यक्ष नेली रॉड्रिगीश यांनी स्वागत केले. नरेंद्र वर्मा, सतीश नरियानी, जुझे फिलीप डिसोझा यांनीही विचार मांडले. समई& प्रज्वलनाने सभेचे उद्घाटन करण्यात आले. सेंड्रा मार्टिनी यांनी आभार व्यक्त केले.
सभेपूर्वी राष्ट्रवादीच्या राज्य कार्यालयाचे प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. पणजीत मार्केट परिसरातील मलबाराव इमारतीत हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्यावेळी चर्चिल आलेमाव, जुझे डिसोझा, नेली रॉड्रिगीश यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.