प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर ग्रामसभा घेण्यास बंदी घालण्यात आली होती. ही बंदी ग्रामविकास खात्याने उठवली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली. दरम्यान ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली गेल्याने बंद असलेल्या गावच्या ग्रामसभा वर्षभरानंतर गजबजणार आहेत.
गतवषी मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने लॉकडाऊनचा कालावधीही वाढत गेला. त्यामुळे ग्रामसभा घेण्यात अडचणी निर्माण झाला. त्यानंतर शासनानेच ग्रामसभा घेण्यास बंदी घातली. त्यामुळे वर्षातून किमान चारवेळा होणाऱया ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. ग्रामपंचायत बॉडीला सर्व अधिकार देण्यात आले होते. काही ठिकाणी ग्रामपंचायतींच्या पाच वर्षांच्या मुदती संपूनसुद्धा कोरोनामुळे निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते.
दरम्यान कोरोनाचा जसा प्रभाव कमी झाला, तशा निवडणुका घेण्यात आल्या. राज्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यानंतर सरपंच निवडही पार पडताच शासनाच्या ग्रामविकास खात्याने ग्रामसभा घेण्यावरील बंदी उठवली. ग्रामसभांतून वेगवेगळे विकासात्मक ठराव घेणे आवश्यक असतात. त्यामुळे ग्रामसभा घेणे अत्यंत आवश्यक होते.