उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी उशिरा जाहीर करण्यात आले. यामध्ये कोकणचे सुपुत्र आणि शिवसेना उपनेते उदय सामंत यांना अतिशय महत्वपूर्ण असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पद देण्यात आले आहे. या जाहीर झालेल्या खातेवाटपानंतर उदय सामंत यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आराखडा तयार करणार आहे. तसेच तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आज 6 जानेवारीपासून सामंत हे कोकण दौरा करणार आहेत.
तंत्रज्ञानाचे शिक्षण महत्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर तरूणवर्गाचे प्रश्न, पालकांच्या अपेक्षा, शिक्षक, प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेवून एक अभ्यासपूर्ण नियोजन तयार करण्यात येईल, असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक जिल्हय़ात एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे, या मागणीकडे आपण आवर्जून लक्ष घालणार आहोत. जेणेकरून कोणत्याही जिल्हय़ाच्या मुलांना तंत्रज्ञान शिक्षणासाठी बाहेरच्या जिल्हय़ात जावे लागणार नाही. सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानताना हे खाते सांभाळताना मुख्यमंत्री यांना अपेक्षित काम करेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण सुलभपणे मिळावे, यासाठी विद्यापीठात काही नवे आमूलाग्र बदल करून त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जास्तीत -जास्त मिळेल, या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले
सामंतांनी गतिमान कारभाराची दाखवली चुणुक
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांचे आपापल्या मतदारसंघात परतल्यावर सत्काराचे जंगी कार्यक्रम मतदार संघातून होत आहेत, मात्र रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी आपल्या कामाला अधिक प्राधान्य देत सत्काराचे सर्व कार्यक्रम फुरसतेने करू, अशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर खातं कुठलं मिळणार, केबीन कुठली मिळणार, याची वाट न पाहता मंत्री उदय सामंतांनी विकासकामांसाठी मुंबईतच 2 दिवसात 11 बैठका घेतल्या आणि गतिमान कारभाराची चुणूक दाखवली आहे. आता कोकण दौऱयातही सत्काराचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवत आपल्या कामाला प्राधान्य दिल्याचे दौऱयाच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे.