शेतकरी-विद्यार्थ्यांना त्रास : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी : पाणीपुरवठय़ावरही परिणाम
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागात अघोषित वीज कपात करण्यात येत असल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. उन्हाळय़ाला सुरुवात झाली की हेस्कॉमकडून असे प्रकार सुरू असतात. या प्रकारामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच कोरोना काळात अनेक उद्योग-व्यवसायांना फटका बसला आहे. याचबरोबर मागील दीड-दोन महिन्यांपासून शाळा-कॉलेजांना सुरुवात झाली आहे. त्यातच ग्रामीण भागात अघोषित वीज कपात करण्यात येत असल्याने समस्या निर्माण होत आहेत.
कोरोनामुळे परीक्षा जूनमध्ये होणार असल्या तरी आणखी दोनच महिने विद्यार्थ्यांकडे उरले आहेत. परीक्षा तोंडावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. परंतु अघोषित वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून किमान रात्रीच्या वेळी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होऊ लागली आहे. भारनियमनामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठय़ावरही मोठा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वीज कपातीत वाढ होण्याची शक्यता
यावर्षी राज्यात विजेचे संकट निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर तर अघोषित वीज कपातीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळा सुरू होताच राज्यात वीज टंचाई भासण्याची चिन्हे दिसून येतात. बाहेरील राज्यांकडून वीज खरेदी करण्यात येत होती. मात्र, आता काहीअंशी राज्यात सुरळीत वीजपुरवठा होत आहे. उन्हाळय़ात विजेची मागणी वाढल्याने असे प्रकार करण्यात येतात. ग्रामीण भागात तर अधिक प्रमाणात वीज कपात करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत दहावी व बारावीची वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे. अघोषित वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांनाही आता विजेच्या वेळापत्रकाप्रमाणे रात्रीच्या वेळी अभ्यास करावा लागत आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच उन्हाचे चटके तीव्र होऊ लागले आहेत. त्यामुळे घरात पंख्यांची घरघरही सुरू झाली आहे. एअर कुलर व इतर गारवा देणाऱया इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात तर अघोषित भारनियमन केले जात आहे. नागरिकांनी किंवा संघटनांनी आंदोलन केल्यानंतर फक्त काही दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे नाटक करण्यात येते, असे वारंवार दिसून येते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती?
अघोषित वीज कपातीचा फटका विद्यार्थ्यांनाही मोठय़ा प्रमाणात बसत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. फेब्रुवारी माहिन्यात 190 दशलक्ष युनिटहून अधिक तर मार्च महिन्यात राज्यात 190 दशलक्ष युनिट विजेची मागणी असते. एप्रिल, मे महिन्यात 200 दशलक्षपेक्षा अधिक युनिटपर्यंत विजेची मागणी वाढते, असा अंदाज आहे. त्यामुळे आता विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच अचानकपणे वीज कपात करण्यात येत असल्याने समस्या निर्माण होणार, यात शंका नाही.