किणये येथील महिला स्नेहमेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्त्या प्रा. कविता पाटील यांचे प्रतिपादन
वार्ताहर / किणये
महिलांनी आपल्या मुलींना गावागावात होणाऱया विविध स्पर्धांमधील खेळ, भाषण, गायन आदी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यामुळे त्यांना व्यासपीठाचे धाडस निर्माण होईल. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या मुलींनाही उच्चशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या प्रा. कविता पाटील यांनी केले.
किणये येथील चौराशी देवी महिला मल्टिपर्पज सोसायटीतर्फे सोमवारी दुपारी ज्ञानेश्वर सभागृहामध्ये महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या या नात्याने प्रा. पाटील बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महिलांनी आपल्या मुलाबाळांवर सुसंस्कार घडविले पाहिजेत. त्यांच्यावर होणारे संस्कारच पुढील आयुष्यासाठी उपयोगी ठरतात, असेही त्या म्हणाल्या. तसेच स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले आदींच्या जीवनावर आधारित काही प्रसंगही सांगून महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौराशी महिला सोसायटीच्या अध्यक्षा वसुंधरा डुकरे
होत्या.
ज्ञानेश्वर को-ऑप. सोसायटीचे चेअरमन तानाजी डुकरे यांनी प्रास्ताविक केले व ज्ञानेश्वर सोसायटी तसेच चौराशी महिला सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱया उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चौराशी देवी, ज्ञानेश्वर माऊली फोटो प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात
आले.
समरसेन पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शनपर भाषण केले. व्यासपीठावर चौराशी सोसायटीच्या उपाध्यक्षा समिक्षा पाटील, ज्ञानेश्वर सोसायटीच्या उपाध्यक्षा पार्वती पाटील, ग्रा. पं. अध्यक्षा स्नेहल लोहार, यशवंत गुरव उपस्थित होते.
महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. त्यानंतर संस्थेमार्फत भेटवस्तूही देण्यात आली.
यावेळी चौराशी महिला सोसायटीच्या संचालिका मीना डुकरे, साधना पाटील, विजया पाटील, आधारिता पाटील, गीता गुरव, विजया गुरव, रेखा पाटील, रिना सांबरेकर, शीतल पाटील, रफिया जमादार, शांता हरिजन आदींसह ज्ञानेश्वर सोसायटीचे संस्थापक संचालक सुरेश डुकरे, संचालक नाना पाटील, रामलिंग गुरव, सातेरी पाटील, नामदेव सांबरेकर, राजेंद्र पाटील, मंगेश पाटील, अन्वरबेग जमादार, यल्लाप्पा पाटील, वनिता कदम आदी उपस्थित होते. यशवंत गुरव यांनी आभार मानले.