जिल्हय़ातील गावोगावच्या सुमारे सव्वादोनशे मंदिरांचे प्रस्ताव जिल्हा नियोजनमधून निधी देण्यासाठी हिरवा कंदील
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हय़ातील गावोगावी असलेल्या अनेक जुनी, ऐतिहासिक मंदिरांच्या विकासाकडे पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक रस्ते, पाणी, वीज यासह पुरक सुविधांचा आराखडा जिल्हा परिषदस्तरावर तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा 127 ठिकाणांच्या यात्रास्थळांची कामे करण्यासाठी 9 कोटी 53 लाखाची गरज आहे.
या ठिकाणी अनेक जुनी, ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक रस्ते, पाणी, वीज यासह पुरक सुविधाही नसल्यामुळे तिथे पर्यटक, भक्तगणांची गैरसोय होते. या सुविधा देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजनमधून दरवर्षी निधी दिला जातो. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागामार्फत आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यावर्षी जिल्हय़ातील 127 ठिकाणांच्या यात्रास्थळांची कामे करण्यासाठी 9 कोटी 53 लाखाची गरज आहे. नियोजनमधून 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.
कोरोना सरल्यानंतर राज्य शासनाने 100 टक्के निधी देण्याची तयारी केली. त्यामुळे अधिकचे 1 कोटी 50 लाख मिळणार आहेत. जिल्हय़ासाठी एकूण 3 कोटीचा निधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजनचा निधी 100 टक्के देण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे निधी कपातीचा परिणाम विकासकामांवर गंडातर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. येथील यात्रास्थळे, तिर्थक्षेत्रांच्या विकासाला खिळ बसणार की काय, असा प्रश्न उभा होता. जिल्हा परिषदेकडून आलेल्या आराखडय़ातील कामांना अंतिम मंजुरी नियोजन समितीमध्ये दिली जाते. या निधीसाठी 1 लाख लोकसंख्येपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश केला जातो. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये याला हिरवा कंदील मिळाला आहे.
जिह्यातील महत्वाची प्रसिध्द काही मंदिरेः दापोलीतील चंडिका मंदिर, खेडमधील झोलाई, चिपळुणातील शारदादेवी, टेरवचे मंदिर, रामवरदायिनी, गुहागरमधील तवसाळ गणेश मंदिर, संगमेश्वरातील मार्लेश्वर, रत्नागिरीतील हातीसचे पीरबाबर शेख, लांजातील केदारलिंग, राजापूर कशेळी येथील श्री कनकादित्यसारख्या मंदिरांसह सुमारे सव्वादोनशे मंदिरांचे प्रस्ताव यामध्ये समाविष्ट आहेत.