प्रतिनिधी/ बेळगाव
येत्या महिना ते दीड महिन्यांत राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. कोरोनामुळे मे महिन्यात होणाऱया निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारी करण्यास सुरुवात केली असून मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांना बक्षीस देण्याची स्पर्धा सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागात सध्या विविध खेळांना अच्छे दिन आले आहेत. कबड्डी, क्रिकेट आदी स्पर्धांचे गावोगावी मोठया प्रमाणात आयोजन करण्यात येत असून दरवेळी बक्षीस मागण्यास गेल्यानंतर टाळाटाळ करणारे काहीजण मुक्तहस्ताने बक्षिसे देत असल्याचे दिसून येत आहे.
ग्राम पंचायत निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने याची सर्व तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच गुडघ्याला बाEिशग बांधण्यास सुरुवात केली आहे. आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची ताकद आहे हे दाखवून देण्यासाठी गावोगावी आयोजित केल्या जाणाऱया स्पर्धांना मोठय़ा प्रमाणात बक्षिसे दिली जात असल्याचे दिसून येत आहे. ऐरवी तीन-चार वर्षे स्पर्धा भरवायची आहे, बक्षीस द्या, अशी मागणी केल्यानंतरही टाळाटाळ करणारे काहीजण आता सढळ हाताने न मागताही बक्षीस देत असल्याची माहितीही मिळत आहे. सध्या सर्वच गावांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
म. ए. समिती, भाजप, काँग्रेस यासह इतर अनेक पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुका लांब असल्या तरी स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवार करू लागले आहेत. त्यामुळेच पाच हजार पासून ते 50-60 हजारापर्यंत बक्षिसे देण्यात येत आहेत. येत्या निवडणुकांच्या माध्यमातून का होईना ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा आयोजित करण्यासाठी चांगली बक्षिसे मिळू लागली आहेत. त्यामुळे युवावर्गही सध्या या स्पर्धांच्या आयोजनात मग्न होत असल्याचे दिसून येत आहे. निवडून येईल की नाही ही पुढची गोष्ट पण आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे हे दाखविण्याचा प्रयत्नच सध्या इच्छुकांकडून सुरू आहे. काही जण तर आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार याबाबत कोणतीही माहिती देत नसले तरी तयारी मात्र जोरात सुरू केली आहे.
दिवाळी सणाच्या माध्यमातून ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात फलक बाजीही करण्यात आली आहे. त्यामुळेच दर पाच वर्षांतून होणाऱया निवडणुका लढविण्याच्या तयारीच्या निमित्ताने का होईना ग्रामीण भागात सध्या खेळांना अच्छे दिन आले आहेत. या स्पर्धांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र या स्पर्धांच्या माध्यमातून गावागावांमध्ये गटबाजीही उफाळून आली आहे. गावांमध्ये असणाऱया गटातटांचा लाभ घेत इच्छुक उमेदवार त्यांना आपल्याकडे करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे एकेका गावांमध्ये एकाचवेळी दोन स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या प्रकारांमुळे काही गावांमध्ये वादावादीचे प्रकारही सामोरे येणार आहेत. आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही सोयीचे राजकारण सुरू केल्याने गावागावांमध्ये मात्र एकी ऐवजी गटतटच वाढत असल्याचे दिसून येत आहे.