‘युद्ध नको शांतता हवी’ ही तर जगभरातल्या स्त्रियांची मागणी आहे. महाभारतातील स्त्रियांचीसुद्धा हीच मागणी होती. परंतु सत्ताप्राप्तीची पुरुषी महत्वाकांक्षा सत्तेच्या सिंहासनासाठी युद्ध पुकारतेच. शत्रुंमध्ये युद्ध होते. परंतु बळी जातात ते सामान्य, निरपराध. महाभारतामध्ये तर सातत्याने याचे चित्रण आपल्याला दिसते. कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झाले तरी अशी अनेक पात्रे या युद्धावेळी महत्वाची भूमिका बजावतात. त्यापैकीच एक ‘घटोत्कच’.
अखिल भारतीय नाटय़परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे मंगळवारी आरपीडीच्या खुल्या रंगमंचावर ‘घटोत्कच’ या नाटकाचा प्रयोग झाला आणि एक अप्रतिम नाटय़ानुभव रसिकांनी अनुभवला. अभिनय कल्याण या संस्थेने हा प्रयोग केला.
खरे म्हणजे युद्ध पुकारेपर्यंत घटोत्कच तसे दुर्लक्षित पात्र. परंतु जंगली संस्कृतीत वाढलेल्या घटोत्कचाला आर्य संस्कृतीचे आकर्षण इतके असते की आईला सोडून तो युद्धात मदतीसाठी म्हणून पांडवांना येऊन मिळतो. परंतु अभिमन्यू असू दे वा कर्ण, त्यांचा अत्यंत खुबीने वापर करुन घेतला गेला आणि आपणही त्याला अपवाद ठरणार नाही, हे घटोत्कच्याच्या लक्षात येते. आपले मूळ शोधण्यासाठी मी आलो. परंतु वस्त्रहरण झालेली संस्कृती पाहण्याचे नशिबी आले. आर्य संस्कृतीचे अवशेष पाहिले आणि संस्कृती माणसाला संकुचित बनवते का? असा प्रश्न त्याला पडतो. हा या नाटकाचा गाभा.
परंतु यामध्ये अनेक उपकथांना जोडत लेखक आशुतोष दिवाण यांनी हे नाटक अधिक प्रभावी केले आहे. तर दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी मोजक्मया नेपथ्याचा वापर करत नाटकातील प्रत्येक प्रसंग खुलवत नेला आहे. हिडींबा आणि घटोत्कच यांच्यातील संवाद पाहता हिडींबेच्या मनात राग आहे, तर घटोत्कच्याचा ज्या पद्धतीने द्रौपदी पाणउतारा करते ते पाहता तिच्या मनात हिडींबेबद्दल असूया आहे, हेही स्पष्ट होते.
दुर्योधन घटोत्कचाच्या बलाढय़तेला घाबरुन गोंधळून जातो. युद्ध नको म्हणतो. तेव्हा त्याच्या क्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पदर उलगडते. कर्णाने अस्त्राचा वापर करुन घटोत्कचाला यमदसनी धाडावे ही दुर्योधनाची आज्ञा कर्णाला विदीर्ण करुन जाते. माणसाला मृत्यूचे भय नेहमीच असते. त्यामागे असते ती जगण्याची आस. कर्ण आणि अभिमन्यु यांच्या मनोगतातून ते अधोरेखीत करण्यात लेखक, दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. कर्णाला वाटणारे मृत्यूचे भय, आरशाचे तडकणे, काठय़ांचा पिंजरा म्हणून वापर, त्याचीच तिरडी होणे यामध्ये दिग्दर्शकाचे कौशल्य दिसते. या नाटकात कोरसचा म्हणजेच सैनिक आणि पहारेकरी यांचा अत्यंत परिणामकारक वापर केलेला दिसतो. प्रत्येक पात्र आपले काम चोख बजावते, हीच सांघिकता नाटकाची जमेची बाजू. मात्र जंगली संस्कृतीचे दर्शन घडविताना घटोत्कच अधिक रानटी हवा, असे वाटते. हे नाटक एका अर्थाने भीती, भय, माया, भ्रष्टता, वासना, प्रेम, जय, पराजय, पराभूत, विवेक ही स्वभाव वैशिष्टय़े टिपते. ‘तरुणांना कशाला युद्धात ढकलता’ हा अर्जुनाचा प्रश्न आजच्या विद्यापीठीय राजकारणाशी येऊन थांबतो.
नाटकात संगीत आणि प्रकाश योजना यांचा वापरही अचूक झाला आहे. काहीसे वैचारिक आणि गंभीर प्रकृतीचे हे नाटक असले तरी रंगमंचावर आज नवीन काय घडते आहे, याचे आकलन करुन घेण्यासाठी हे नाटक पहालयाच हवे. दुर्दैवाने बेळगावकरांनी या प्रयोगाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. हे खरे तर त्यांचे दुर्दैव.