कडेगाव/ प्रतिनिधी
कोरोनाच्या अगोदर आजारी पडल्यावर उपचारासाठी मिळेल त्या वहानाने प्रसंगी पायपीट करत डॉक्टरांकडे जावे लागत होते. अलिकडच्या काळात लोकांना घरपोच सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अंगणवाडी सेविका दररोज स्वतः च्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. सर्व्हेच्या माध्यमातून घरोघरी जावून तुमच्यात कोण आजारी आहे काय? कोणाला काय त्रास आहे काय ? असे विचारत आहेत. आरोग्य सेविका या संकट काळात आरोग्य दूत बनल्या आहेत.
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका शून्य ते ६ वर्षे वयोगटातील लहान मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. त्याच बरोबर शासनाच्या अनेक योजना, उपक्रम, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे. सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा बिकट प्रसंगी घरोघरी जावून सर्व्हे करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या वर येवून पडली आहे.
शिक्षण कमी असो की जादा अनुभव व काम करण्याची कसोटी या जोरावर त्या न चुकता अत्यंत जबाबदारीने काम पार पाडत आहेत. घरातील लोकांची संख्या, वय, आजारी लोकांची माहिती, बाहेरून कोणी आले आहे काय, ते कोठे राहतात आदी माहिती ते संकलित करीत आहेत. कोरोना संसर्ग असलेली गावे, शहर तसेच ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर जाऊन अंगणवाडी ताई काम करीत आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचे काम बहुमोल ठरत आहे. त्यांच्या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग पाऊले उचलत आहेत. त्यामुळे कोरोनो रुग्णाची बाधा होण्याअगोदर पहिल्या टप्प्यात त्यांच्या वर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.