ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊनमुळे रोजगार नसल्याने परराज्यात अडकलेल्या मजूरांना त्याच्या घरी परत जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या मजूर व कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच आता काँग्रेसकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
परराज्यातून आपल्या घरी परतत असलेल्या मजूर आणि कामगारांच्या रेल्वेच्या तिकिटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केली.
त्या म्हणल्या, भारतीय काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, राज्य काँग्रेस कमिटीच्या प्रत्येक विभागाने मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा खर्च उचलावा.
पुढे त्या म्हणाल्या, कामगार आणि मजूर हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. आपले सरकार परदेशात अडकलेल्यांना मदत करते पण आपल्या देशाच्या प्रगतीचे दुत असणाऱ्या या स्थलांतरित मजुरांना या कठीण काळात मोफत रेल्वे प्रवास का करू देत नाही आहे, असा सवाल करत त्यांनी यावेळी सरकारवर टीका केली. तसेच या स्थलांतरित मजुरांच्या पाठीशी आम्हीं ठामपणे उभे आहोत असे ही त्यांनी म्हटले आहे.
केवळ चार तासात लॉक डाऊनची घोषणा केली गेली. त्यामुळे या मजुरांना घरी जाण्यास संधीच मिळाली नाही असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.