वृत्तसंस्था / कोलकाता
चहा उद्योगातील कर्मचाऱयांसाठी विशेष कल्याणकारी योजना आणण्यासाठी भारतीय चहा बोर्ड काम करत आहे. अर्थसंकल्पामध्ये आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहा बागांमध्ये काम करत असणाऱया कामगारांसाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या प्रस्तावानंतर सदरची अंमलबजावणी सुरु केली आहे.
सदरच्या योजनेसाठी करण्यात येणाऱया उपक्रमाची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात दक्षिणेकडील राज्यांसाठी काही विशेष तरतूद करण्याची घोषणा केली होती. याचा सकारात्मक भाग म्हणून यासाठीची कार्यवाही आता सरकारसोबत चहा मंडळाकडून करण्यात येत आहे.
महिला-मुलांसाठी विशेष योजना
चहाच्या बागांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांच्या महिला आणि मुलांसाठी चहा मंडळाकडून जवळपास 1,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. चहा मंडळाकडून आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासाबाबत कर्मचाऱयांना मार्गदर्शन, उपक्रम राबवले जाणार आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये चहा उद्योगात जवळपास 6.23 लाख महिला काम करत आहेत. सदर योजनांचा लाभ मिळाल्याने तेथील कर्मचाऱयांच्या जीवनात बदल घडून येणार आहे.