केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना – संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ आढळल्यानंतर जगभरात खबरदारीचे उपाय आखले जात आहेत. भारतानेही सावधगिरीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच नव्या बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे काही राज्यांमध्ये एकूण चाचणी तसेच आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, आता ‘ओमिक्रॉन’ व्हायरसचा शिरकाव होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. काही राज्यांमध्ये कमी चाचणी होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. केंद्राच्या पत्रात त्या राज्यांची नावे नमूद करण्यात आली नाहीत. राज्यांनी चाचणीसाठी पायाभूत सुविधा मजबूत केल्या पाहिजेत आणि चाचणी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, अशी स्पष्ट सूचना राज्यांना करण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणेला केले अलर्ट
राज्यांमध्ये अन्य देशांमधून दाखल झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवणे, त्यांनी मागील कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. संसर्गाची जोखीम असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांचे तत्पर लॅबमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात यावे, अशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे. एकंदर ओमिक्रॉनच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची सूचना केंद्राने आरोग्य विभागाला केली आहे.
‘हॉटस्पॉट’ ठिकाणांवर राहणार नजर
कोविड हॉटस्पॉटवर देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. हॉटस्पॉटवर सातत्याने देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात यावे अशी केंद्राने सूचना दिली आहे. त्याशिवाय, चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याची सूचना केंद्राने राज्यांना दिली आहे.