ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱया मणिपूरच्या मिराबाई चानूवर आता बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला असून मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राज्य सरकारतर्फे 1 कोटी रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटाच्या वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी रौप्यपदक जिंकून भारताचे पदकाचे खाते खोलले. ‘भारताला तू पहिले पदक मिळवून दिल्याचे वृत्त उत्तर-पूर्व राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी समजले. ते ऐकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील खुश झाले आणि भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर शाह यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्वांनीच उभे राहून तुला मानवंदना दिली. या कामगिरीचे बक्षीस म्हणून राज्य सरकारततर्फे तुला 1 कोटी रुपये देण्याचेही यावेळी जाहीर केले,’ असे बिरेन सिंग यांनी चानूला पाठविलेल्या अभिनंदनाच्या संदेशात म्हटले. ‘यापुढे तुला रेल्वे स्टेशन्सवर तिकीट काढत बसण्याची वेळ येणार नाही. तुझ्यासाठी स्पेशल जागा यापुढे ठेवली जाईल. या संदर्भात मी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे,’ असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.