वार्ताहर/ चाफळ
येथील चारुदत्त साळुंखे याची भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून नुकतीच निवड झाली. त्यानंतर नुकत्याच युपीएससीमधून घेण्यात आलेल्या आयईएस या उच्चस्तरीय परीक्षेत देशामध्ये पहिला येण्याचा मान पटकावत त्याने यशाची गुढी उभारली आहे. त्याच्या देदीप्यमान गगन भरारीने चाफळच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
चाफळसारख्या ग्रामीण भागातील असणाऱया चारूदत्तचे प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथे झाले. शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला 94.55 टक्के गुणांसह तो उत्तीर्ण झाला. एमजीएम कॉलेज कराड येथून 92.33 टक्क्यांसह विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. पुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ऍटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्यानंतर एकाहून एक कंपन्यांमधून नोकरीच्या संधी असताना देखील खासगी क्षेत्रात जॉब न करता शासकीय सेवेत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट 2020 या परीक्षेतून देशातून 48 वा क्रमांक मिळवत यशाच्या शिखराला गवसणी घातली. या यशाच्या जोरावरच संपूर्ण देशाच्या टेक्निकल क्षेत्राला दिशा देणाऱया भाभा अनुसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झाला. त्यानंतर यूपीएससीमधून घेण्यात आलेल्या आयईएस या उच्च स्तरीय परीक्षेत चारुदत्त यांनी देशामध्ये पहिला येण्याचा मान पटकावत यशाची गुढी फडकवत ठेवली आहे. ग्रामीण भागाचा, आर्थिक परिस्थितीचा, कौटुंबिक गोष्टींचा कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे चारुदत्त साळुंखे याने सांगितले. या देदीप्यमान यशाबद्दल चारुदत्तवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.