तरुण भारत संवाद
प्रतिनिधी/सोलापूर
खटल्याचे कामकाज सुरु असताना आरोपींनी न्यायालयावर हल्ला केला होता. त्यानंतर सुद्धा न्यायालयाने निर्भिडपणे खून खटला चालवून महिलेचा खून केल्याप्रकरणी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी सुनावली.
भिमराव देवराव राठोड (वय 42), राहूल भिमराव राठोड (वय 21), रोशन भिमराव राठोड (वय 19), राजू महादेव चव्हाण (वय 19, सर्व रा. शिवाजी नगर तांडा, अक्कलकोट) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सुनंदा शंकर घोडके (वय 36) हिचा खून केल्याप्रकरणी तसेच फिर्यादी रेश्मा दादासाहेब पळसे (वय 32, रा.तरट गांव, ता.पंढरपूर जि.सोलापूर) हिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
आरोपी भिमराव राठोड, राहूल राठोड, राजू चव्हाण, रोशन राठोड हे 3 मे 2015 रोजी जीप (क्र. एमएच 13 एझेड 8196) मध्ये बसून सोलापूरकडून मंगळवेढय़ाकडे निघाले होते. कामती खुर्द येथील गोडबोले बस स्टॉपच्या अलीकडे रेश्मा पळसे व तिची बहिण सुनंदा घोडके या दोघी चालत जात होत्या. त्यांनी हात करून जीप थांबविली. आरोपींनी त्यांची जीप थांबवून, त्या दोघींना जीपमध्ये घेतले. त्यानंतर जीप कामती बुदुक गावाच्या पुढे थोडय़ा अंतरावर मंगळवेढाकडील बाजूस गेली. त्यावेळी आरोपी भिमराव याने रेश्मा यांचा दोरीने गळा आवळला. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याच दोरीने त्यांची बहिण सुनंदा यांचाही गळा आवळला. दोघींच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल काढून घेवून दोघींना कोरवली गावाच्या माळरानावर नेऊन टाकून दिले होते. त्यामध्ये सुनंदाचा मृत्यू झाला तर रेश्मा या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आरोपीविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालला. या खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये जखमी फिर्यादी, नेत्रसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार के.व्ही.बडवे, तपासी अंमलदार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची साक्ष महत्वाची ठरली.
हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे जिल्हा सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयात सर्व आरोपींना खून प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 3 वर्षे कारावास, खूनाचा प्रयत्न प्रकरणात जन्मठेप व 15 हजार दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 2 वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ऍड. राजेंद्रसिह बायस यांनी काम पाहिले.
न्यायालयावर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपींना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये आरोपी भीमराव यास येरवडा, आरोपी राहुल हा कोल्हापूर, आरोपी राजू यास नाशिक तर आरोपी रोशन यास औरंगाबाद येथील कारागृहात ठेवण्यात आले होते.
आरोपींचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
आरोपींनी सुरुवातीपासूनच खटल्याचे कामकाज थांबविण्याकरीता विविध प्रकारचे अडथळे आणले होते. या खटल्याचे कामकाज थांबविण्यात यावे तसेच खटला दुसऱया न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावा याकरीता आरोपींनी जिल्हा प्रमुख न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, उच्च न्यायालयाने या कोर्टात खटला चालविण्यात यावा असे आदेश दिले. आरोपींनी त्यांच्या वकिलासही दमदाटी केली होती. यामुळे त्यांनी वकिलपत्र काढून घेतले होते. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वकिलांची नियुक्ती करण्यात येऊन हा खटला चालविण्यात आला.